मुंबईकरांचे एसी लोकलमधून प्रवास करण्याचे स्वप्न २५ डिसेंबर २०१७ रोजी पूर्ण झाले. देशातली पहिली एसी लोकल मुंबईच्या पश्चिम मार्गावरून धावू लागली. एसी लोकल सुरू होऊन आता अकरा दिवस झाले. पण, थंडगार प्रवास मुंबईकरांना काही परवडताना दिसत नाही. त्यामुळेच अकरा दिवसांत जिथे ५ लाखांहून अधिक प्रवाशांनी थंडगार प्रवास करणे अपेक्षित होते, तिथे केवळ ८ टक्के प्रवाशांनी म्हणजेच ३४ हजार १९२ प्रवाशांनी प्रवास केला आहे.
आकडेवारीवरून तरी मुंबईकरांनी एसी लोकलकडे पाठ फिरवल्याचंच दिसून येत आहे. त्याचं मुख्य आणि एकमेव कारण म्हणजे एसी लोकलचं महागडं तिकीट! त्यामुळे आता तिकीट दर कमी करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
चर्चगेट ते विरार १२ डब्ब्यांची एसी लोकल धावू लागली असून तिची प्रवासी क्षमता ५९६४ आहे. २५ ते ३१ डिसेंबर यादरम्यान लोकलच्या दिवसाला ६ फेऱ्या धावल्या असून १ जानेवारीपासून दिवसाला एसी लोकलच्या १२ फेऱ्या होत आहेत. त्यानुसार आतापर्यंत अकरा दिवसांत ९० फेऱ्या झाल्या असून प्रवासी क्षमतेनुसार विचार करता आतापर्यंत ५ लाख ३६ हजार ७६० प्रवाशांनी प्रवास करणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात मात्र केवळ ३४ हजार १९२ अर्थात उण्यापुऱ्या ८ टक्के प्रवाशांनीच प्रवास केला आहे.
९० फेऱ्यांमधून ३४ हजार १९२ प्रवाशांनी प्रवास केला असून यातून ४२७७ तिकीटांची विक्री झाली आहे. तर या तिकीट विक्रीतून पश्चिम रेल्वेला १४ लाख ७८ हजार १०२ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. याशिवाय अकरा दिवसांत ४६ प्रवाशांना विना तिकीट प्रवास करताना पकडण्यात आले असून त्यातून पश्चिम रेल्वेला १६ हजार ९८५ रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे.
एकीकडे तीन वर्षांपूर्वीच मुंबईकरांचे थंडगार प्रवासाचे स्वप्न पूर्ण करणारी मेट्रो आजही प्रवाशांनी खच्चून भरलेली पाहायला मिळते. तर दुसरीकडे एसी लोकलमध्ये मात्र तुरळक प्रवासी पाहायला मिळत आहेत.
मेट्रोमधून दिवसाला सरासरी ४ लाख प्रवासी प्रवास करतात. नोव्हेंबर २०१७ मध्ये तर मेट्रोने विक्रमच केला होता. महिन्याभरात १ कोटी २ लाख ५७ हजार प्रवाशांनी मेट्रो सफर केली होती. मेट्रो प्रकल्पात पंचतारांकित सुविधा असून मेट्रोचे तिकीटही प्रवाशांना परवडणारे, १० ते ४० रुपये असे आहे. असे असताना एसी लोकलचे तिकीट दर मात्र ८५ ते २०५ रुपये असे आहेत. त्यामुळे 'गार नसली तरी चालेल, पण खिशाला भार नको!' अशीच काहीशी प्रतिक्रिया मुंबईकरांकडून व्यक्त होताना दिसत आहे!
हेही वाचा