नांदेड-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसच्या प्रवासाबाबत रेल्वे प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला असून आता या एक्स्प्रेसचा वेग वाढवण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवासातील अमूल्य वेळ वाचणार असून मराठवाड्याचा मुंबईशी असलेला संपर्क अधिक वेगवान होणार आहे.
रेल्वे ट्रॅक आणि विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यामुळे हा बदल शक्य झाला असून ३ मे पासून प्रवाशांना या सुसाट प्रवासाचा अनुभव घेता येईल.
सध्या नांदेड-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस ताशी 100 किमी वेगाने धावते, मात्र आता ही सेमी-हायस्पीड ट्रेन ताशी 130 किमी वेगाने धावणार आहे. या वेग बदलामुळे नांदेडहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचे तब्बल 30 मिनिटे वाचणार आहेत. तर छत्रपती संभाजीनगरहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वेळ 20 मिनिटांनी कमी होणार आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या हिरव्या कंदिलामुळे आता प्रवाशांना कमी वेळेत आपले नियोजित स्थळ गाठता येईल. व्यापारी, विद्यार्थी आणि पर्यटकांच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
सुधारित वेळेनुसार, 20705 ही एक्स्प्रेस आता हजूर साहिब नांदेडहून सकाळी 5:00 ऐवजी सकाळी 5:20 वाजता सुटेल. परभणी येथे ही एक्स्प्रेस सकाळी 5:58 वाजता पोहोचून 6:00 वाजता प्रस्थान करेल. जालन्यात सकाळी 7:33 वाजता आगमन होऊन 7:35 वाजता सुटेल.
छत्रपती संभाजीनगरच्या प्रवाशांसाठी ही रेल्वे सकाळी 8:23 वाजता येईल आणि 8:25 वाजता मुंबईच्या दिशेने रवाना होईल. मनमाड आणि नाशिक येथील वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ही वंदे भारत एक्स्प्रेस मुंबईतील सीएसएमटी स्थानकावर दुपारी 2:25 ऐवजी आता दुपारी 2:15 वाजता पोहोचेल.
परतीचा प्रवास आणि इतर रेल्वेवर परिणाम
परतीच्या प्रवासात 20706 ही एक्स्प्रेस मुंबईहून दुपारी 1:10 ऐवजी 1:15 वाजता सुटेल. छत्रपती संभाजीनगरला ही गाडी संध्याकाळी 6:53 ऐवजी आता 6:43 वाजता पोहोचेल. वंदे भारतचा वेग वाढल्यामुळे या मार्गावरील इतर काही गाड्यांच्या वेळेतही किरकोळ बदल करण्यात आले आहेत.
हेही वाचा
