थर्टी फर्स्टच्या निमित्ताने जादा बस गाड्या सोडण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरला रात्री समुद्रकिनाऱ्यांवर येणाऱ्या नागरिकांसाठी बेस्टच्या जादा बसगाड्या सोडण्यात येतील.
नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच याव्यतिरिक्त इतर समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या संख्येने लोक येतात. त्यांच्या सोयीसाठी बेस्टने ७ (मर्या.),१११, ११२, २०३, २३१, २४७ आणि २९४ या क्रमांकाच्या २० जादा बसगाड्या मुंबईतील समुद्रकिनारा असलेल्या मार्गांवर रात्री १० वाजल्यापासून सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रवाशांच्या मदतीसाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, जुहू चौपाटी, गोराई बीच तसेच चर्चगेट स्थानक (पूर्व) आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इत्यादी ठिकाणी वाहतूक अधिकारी, बसनिरीक्षकांची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली आहे.