मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाहून राजधानी एक्स्प्रेस यासह इतर १२ पूर्णत: आरक्षित रेल्वेगाड्या सुरू आहेत. आरक्षित डब्यांमध्ये बसणाऱ्या प्रवाशांकडून मात्र ना तोंडाला मास्क घातले जात आहे, ना फिजिकल डिस्टन्सिंग ठेवले जात आहे. कोरोना विषाणू संसर्गाचे संकट दिवसागणिक गंभीर होत चालले आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागानं अद्याप पॅसेंजर रेल्वे सुरू केलेली नाही. मात्र, विशेष गाड्या सुरू आहेत.
सध्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात दररोज १३ गाड्या येतात आणि येथून १३ गाड्या सुटतात. यामध्ये सौराष्ट्र मेल, गोल्डन टेम्पल, अवंतिका, जयपूर सुपर, नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस, वलसाड लोकल, फ्लाईग राणी, ऑगस्ट क्रांती निझामुद्दीन, कर्णावती, डबलडेकर, तेजस(अहमदाबाद), शताब्दी, दिल्ली दोरंतो या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या पूर्णत: आरक्षित या नियमांखाली सुरू करण्यात आल्या आहेत.
या गाड्यांनी प्रवास करणाऱ्यांकडून सोशल डिस्टन्सिंग, मास्क परिधान करणे यासारख्या महत्त्वाच्या नियमांचे पालन होते किंवा नाही, याची पाहणी केली असता अनेकांकडून नियमाचे उल्लंघन होत असल्याचा प्रकार निदर्शनास आला. असं असताना कारवाईकडे रेल्वे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे.
मुंबई सेंट्रलवरून जाणाऱ्या गाड्या
'विनामास्क'वर कारवाई नाही
नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेसनं प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांच्या तोंडावर मास्क नव्हता. याप्रकरणी पाहणी करून रेल्वे विभागाच्या पथकानं कारवाई करणं अपेक्षित आहे. मात्र, याकडं दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे. नागरिकही बेफिकीर असून, कोरोनापासून बचावासाठी पुढाकार घेत नसल्याचं पाहावयास मिळत आहे.
रेल्वेनं प्रवास करणाऱ्या नागरिकांनी स्वत:चं संरक्षण करण्यासाठी नियमित तोंडाला मास्क परिधान करायला हवा. यासह सामाजिक अंतराच्या नियमांचं पालन करायला हवं. पण रेल्वेत नियम पाळले नाही तर यासंबंधी कारवाईचे अद्याप कुठलेही आदेश मिळालेले नाहीत तसे आदेश असल्यास निश्चितपणे कारवाई सुरू केली जाईल.