मुंबई - आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्टने आता बेस्टच्या तिकीट दरातच वाढ करण्याचे निश्चित केले असून, सध्याच्या तुलनेत तिकीटात 50 टक्के वाढ केली जाणार आहे. सध्या आकारण्यात येणाऱ्या किमान बस भाड्याच्या 8 रुपये शुल्काच्या तुलनेत प्रशासनाने आता किमान भाड्यात 4 रुपयांनी वाढ करत 12 रुपये एवढे तिकीट शुल्क आकारण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता येत्या काही दिवसांमध्ये बस तिकीटासाठी 12 रुपये मोजावे लागणार आहे.
बेस्ट उपक्रमाची आर्थिक स्थिती हलाखीची असल्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी महापालिका प्रशासनाने दिलेल्या अहवालाची अंमलबजावणी करण्याची तयारी बेस्ट उपक्रमाने दर्शवली आहे. त्यासाठी उपक्रमाने काटकसरीच्या उपाययोजना तयार केल्या असून, त्याचा अहवालच प्रशासनाने बेस्ट समितीला सादर केला आहे. या अहवालामध्ये कामगारांचा महागाई भत्ता गोठवण्यापासून विविध भत्यांना कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्ट कामगारांचा 1 एप्रिल 2017 पासून महागाई भत्ता गोठवण्यात येणार आहे. वातानुकूलीत बस सेवा बंद करतानाच बस भाड्यात चार रुपयांनी वाढ करण्यात येणार आहे. सर्वसाधारण, मर्यादीत बस तिकिटात कि.मी मागे चार रुपयांनी वाढ केली जाणार आहे. एवढेच नव्हेतर वातानुकूलीत बसेस बंद करण्याचा प्रस्ताव प्रस्तावित करणाऱ्या प्रशासनाने तिकीटात दहा रुपयांनी वाढ दर्शवली आहे. सध्या वातानुकूलित बसेससाठी किमान भाडे हे 15 रुपये आहे, त्यातुलनेत ही वाढ 10 रुपयांनी वाढवून 25 रुपये करण्यात येणार आहे. याबरोबरच बसपासात वाढ करतानाच विद्यार्थी आणि पत्रकारांना दिलेल्या सवलती रद्द करून त्यात वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
बेस्ट उपक्रम अशा प्रकारे करणार काटकसर
सर्वसाधारण बस भाडे |
कि.मी | विद्यमान दर | वाढवण्यात येणारा दर (रुपये) |
2 | 8 | 12 |
4 | 10 | 14 |
6 | 14 | 18 |
8 | 16 | 20 |
10 | 18 | 22 |
12 | 20 | 24 |
14 | 22 | 26 |
17 | 24 | 28 |