रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा सुकर होण्यासाठी रेल्वे प्रशासनं आतापर्यंत अनेक सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत. मात्र तरीही लोकल गर्दीचा प्रश्न अद्याप कायम आहे. त्यामुळं हा प्रश्न सोडवायचा असेल तर त्याला वेळ लागेल. त्यासाठी राज्य आणि केंद्रानं एकत्रित उपाययोजना करायला हव्यात, असं मत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलं.
केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने राजकोट ते कनालूस आणि निमच ते रतलाम रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला मंजुरी दिली आहे. त्याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. निमच ते रतलाम रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणासाठी ११८४. ६७ कोटींचा खर्च केला जाणार असून, हा प्रकल्प ४ वर्षात पूर्ण होणार आहे. राजकोट ते कनालूस रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणासाठी ११६८. १३ कोटी खर्च होणार असून, हा प्रकल्प ४ वर्षात पूर्ण होणार आहे.
लोकल गर्दी कमी करण्याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं मत
तर सध्या रेल्वेच्या विशेष गाड्या सुरू आहेत, त्यामुळे विशेष तिकीटदर आकारले जात आहेत, त्याबाबत ते म्हणाले की, सध्या कोरोनापूर्व काळाच्या ६० टक्के सेवा सुरू आहेत. काही बाबींची पडताळणी सुरू आहे. लवकरच तिकीट दर पूर्ववत केले जातील.
हायब्रिड लोकलबाबत एक सर्व्हे करण्यात आला होता. या सर्व्हेमध्ये ७० टक्के नागरिकांनी पसंती दर्शवली होती. त्यानुसार येत्या दोन ते तीन वर्षांमध्ये हायब्रिड लोकल सेवा देणार आहे. हायब्रिड लोकल सेवेमध्ये महिला सुरक्षेबाबत विशेष काळजी घेण्यात येणार असल्याचं समजतं. हायब्रिड लोकल पश्चिम आणि मध्य रेल्वेवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. रेल्वे विभागाकडून एसी लोकल सुरू करण्याच्या दिशेने काम सुरू आहे. लोकल एसी आणि नॉनएसी दोन्ही प्रकारात धावणार आहे. प्रत्येक डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा बसविण्यात येणार आहेत. या हायब्रिड लोकलमध्ये फर्स्ट क्लासचा डब्बा नसणार आहे. तसेच महिला सुरक्षेसंदर्भात विशेष काळजी घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारकडे ज्या ज्या मागण्या केल्या आहेत. त्या मागण्या राज्य सरकार वेळोवेळी पूर्ण करत आहे. होमगार्डबाबतची मागणीही राज्य सरकार लवकरच पूर्ण करेल, अशी अपेक्षा कन्सल यांनी व्यक्त केली.