सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या वाढलेल्या तापमानामुळे मुंबईकर पुरते हैराण झाले आहेत. त्यातच मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शुद्ध आणि थंड पाणी देणाऱ्या वॉटर वेंडिंग मशीनच काम करत नसल्याने प्रवासी पुरते हैराण झाले आहेत. अपुऱ्या वेंडिंग मशीनचाही प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याने प्रत्येक स्थानकावर एक तरी मशीन लावण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.विशेष म्हणजे रेल्वे स्थानकावर फक्त रेल नीर पाणी विकण्यास परवानगी आहे. मात्र हे पाणी देखील बऱ्याच वेळा उपलब्ध नसल्याची खंत प्रवाशांनी व्यक्त केली आहे. मोठा गाजावाजा करून रेल्वेच्या विविध स्थानकांवर 45 मशीन बसवण्यात आल्या होत्या. मात्र त्याही अपुऱ्या आणि धूळखात पडल्याचं चित्र पहायला मिळत आहे. दरम्यान, उन्हाळ्यात जास्तीत जास्त प्रवासी फिरायला जातात. त्यामुळे मशीनच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.
अनेक स्थानकांवर रेल नीर पाणी तर मिळत नाही. त्यातच प्लॅटफॉर्मवर पाणी पिण्यासाठी एकच मशीन असेल तर इकडून तिकडे जावं लागतं. पाणपोई आहेत पण त्या बिनकामाच्या आहेत. विशेष म्हणजे रेल नीर पाण्याच्या बॉटल्सला 20 रुपये मोजावे लागत आहेत.
तरी देखील प्रवाशांना पाण्याविनाच रहावे लागत आहे.श्वेता हेंद्रे, प्रवासी