गणेशोत्सवासाठी अलिबाग, मांडवा भागात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. २० ऑगस्टपासून मुंबई ते अलिबागदरम्यान रो रो फेरी सेवा सुरु करण्यात येणार आहे. भाऊचा धक्का ते मांडवा अशा मार्गावर ही रो रो सेवा सुरु होणार आहे. गणेशोत्सव काळात चाकरमान्यांना याचा फायदा होणार आहे. यासाठी ११ दिवसांसाठीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. रो रो सेवेमुळं रस्ते मार्गानं तीन तासांच्या प्रवासाऐवजी अलिबागपर्यंतच्या प्रवासाठी ४५ मिनिटे इतका वेळ लागणार आहे.
भाऊचा धक्का ते मांडवा रो रो सेवा १५ मार्च रोजी सुरु झाली होती. मात्र, कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळं ही सेवा बंद होती. पण, आता मात्र रुग्णसंख्या काही अंशी नियंत्रणात येत असल्याचं पाहून सुरु झालेल्या अनलॉकच्या टप्प्यामध्ये रो रो सेवेचाही समावेश झाला आहे. अलिबाग ते मुंबई हे अंतर रस्ता मार्गानं ९६ किलोमीटर इतकं आहे. हे अंतर पार करण्यासाठी साधारणपणे ३ ते ३.३० तासाचा कालावधी लागतो. रो रो सेवेमुळे मोठं अंतर वाचणार आहे.
जहाजात १००० लोकांना चांगल्या हवामानामध्ये आणि ५०० लोकांना खराब हवामानात समुद्रमार्गे होणाऱ्या प्रवासासाठी सामावून घेण्याची क्षमता आहे. या जहाजात सर्व परिस्थितीमध्ये २०० कार सामावून घेण्याची क्षमता देखील आहे. इंधनाची बचत करुन वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी या सेवेची मदत होणार आहे. या जहाजातून प्रवासी त्यांच्या प्रवासासाठी तीन श्रेणीतून निवडू शकतात.
हेही वाचा