Advertisement

भारतीय रेल्वे गाड्यांमध्ये कोणत्याही वेळी होऊ शकतो मोठा अपघात!


भारतीय रेल्वे गाड्यांमध्ये कोणत्याही वेळी होऊ शकतो मोठा अपघात!
SHARES

भारतीय रेल्वेतून दर महिन्याला जवळपास 10 कोटी टन माल (वस्तू)ची ने आण केली जाते. विशेष म्हणजे रेल्वेतून जो माल (वस्तू) पार्सल केला जातो, तो सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कॅन आणि तपासण्याची कोणतीही व्यवस्था नाही, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना पश्चिम रेल्वेचे जनमाहिती अधिकारी तथा वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आरती सिंह परिहार यांनी दिली आहे.


आरटीआय कार्यकर्त्यांनी विचारली माहिती

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेकडून मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, बोरीवली, सीएसएमटी, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे आणि कल्याण रेल्वे स्टेशनवर पार्सल केला जाणाऱ्या मालाला सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कॅन आणि तपासण्याची जबाबदारी कोणाची? तसंच पार्सलला सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कॅन आणि तपासणीसाठी काय नियम, कायदे आहेत? यासंदर्भाची माहिती विचारली होती. ज्यानंतर पश्चिम रेल्वेचे जनमाहिती अधिकारी तथा वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आरती सिंह परिहार यांनी माहिती दिली आहे. 


'ही' जबाबदारी वाणिज्य विभागाची

मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस आणि बोरीवली या स्टेशनवर पार्सलला तपासण्याची सध्या कोणतीही व्यवस्था नाही. पार्सल केंद्रावर सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कॅनर लावण्याची जबाबदारी वाणिज्य विभागाची आहे. पार्सलला सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कॅन आणि तपासणीसाठी नियम आणि कायदे प्रस्तावित आहेत. पार्सलसाठी काही गाड्यांना कंत्राटावर दिले आहे. तरी मध्य रेल्वेचे जनमाहिती अधिकारी यांनी माहिती देण्यास नाकारले आहे.


आरटीआय कार्यकर्त्यांच्या मते


एकीकडे सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रवाशांना रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवेश करण्यासाठी मेटल डिटेक्टर मशीनमधून जावं लागतं. आणि त्यांच्याकडे असलेलं सामान स्कॅनर मशीनमध्ये टाकावं लागतं. पण, दुसरीकडे भारतीय रेल्वे दर महिन्याला कोट्यावधी टन माल (वस्तू) पार्सल कोणतीही तपासणी न करता रेल्वेगाड्यांतून ने-आण करतात. रेल्वेच्या या त्रुटीचा गैरफायदा दहशतवादी संघटना घेऊन कोणत्याही प्रकारचे स्फोटकं ऑब्जेक्ट (बॉम्ब) पार्सल करून दहशतवादी हल्ला घडवून आणू शकतात. तर याला जबाबदार कोण राहणार? असा प्रश्न शेख यांनी रेल्वे प्रशासनाला विचारला आहे.

यासंदर्भात शकील अहमद शेख यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि रेल्वे बोर्ड चेअरमन अश्विनी लोहानी यांना पत्र पाठवून सर्व पार्सल केंद्रावर स्कॅनर लावण्याची मागणी केली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अन्य ठराविक उपाययोजना करण्याची मागणीसुद्धा त्यांनी केली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा