राज्याचा २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा १०,२२६ कोटी रुपयांचा तुटीचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मुंबईसाठीच्या इतर घोषणा व तरतुदी केल्या आहेत. प्रामुख्याने मुंबईच्या नागरी सुविधा सुधारण्यासाठीच्या केलेल्या घोषणांचा समावेश आहे. त्यात मुंबईची वाहतूक सुधारण्यासाठीच्या प्रस्तावांसाठी तरतुदी करण्यात आल्या आहेत.
विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉर
विरार, भिवंडी, कल्याण, पनवेल, उरण, पेण व अलिबाग या शहरांच्या विकासासाठी तसेच जेएनपीटी, नवी मुंबई विमानतळ आणि शिवडी-न्हावाशेवा मार्गाला जोडणाऱ्या ४० हजार कोटी रुपये किंमतीच्या १२६ किमी लांबीच्या विरार ते अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉरसाठीच्या भूसंपादनाचं काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू आहे. ठाणे खाडीला समांतर १५ किमी लांबीचा आणि ४० मीटर रुंदीचा ठाणे कोस्टल रोड उभारण्यात येत आहे. त्यासाठी १ हजार २५० कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचं अजित पवार म्हणाले.
वरळी-शिवडी ४ पदरी उड्डाणपूल
मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्था जागतिक स्तरावरची असायला हवी. त्यासाठी शिवडी-न्हावाशेवा प्रकल्प पूर्ण करण्याचं सरकारचं नियोजन आहे. वांद्रे-वरळी सागरी मार्ग शिवडी-न्हावाशेवा मार्गाला जोडण्यासाठी वरळी ते शिवडी या चारपदरी उड्डाणपुलाचं काम सुरू झालं असून ते तीन वर्षांत पूर्ण करण्याचं नियोजन आहे.
१४ मेट्रो लाईनचे ३३७ किमी लांबीचे काम प्रगतीपथावर
- मुंबईतल्या १४ मेट्रो लाईनचे ३३७ किमी लांबीचे काम प्रगतीपथावर आहे.
- १ लाख ४० हजार ८१४ कोटी खर्च अपेक्षित आहे. मेट्रो मार्ग २ अ, मेट्रो मार्ग ७ यावरची कामं २०२१पर्यंत पूर्ण करण्यात येतील.
- गोरेगाव मुलुंड लिंकरोड प्रकल्पाची किंमत ६६०० कोटी रुपये असून निविदांची कारवाई सुरू आहे
वसई-कल्याण जलमार्ग
- मुंबई-ठाणे-नवी मुंबई या शहरांभोवती असलेल्या जलमार्गांचा वाहतुकीसाठी वापर होणार आहे.
- वसई-कल्याण हा जलमार्ग सुरू करण्यात येईल.
वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू
- वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूचे काम सुरू करण्यात आले आहे.
- १७.१७ किमी लांबीच्या या प्रकल्पाची किंमत ११ हजार ३३३ कोटी रुपये आहे.
- वांद्रे, वर्सोवा-विरार या सागरी सेतूची अंदाजे किंमत ४२ हजार कोटी रुपये आहे.
- कामाचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे.
इतर सुविधा व तरतुदी
- कोस्टल रोडचं काम जलदगतीने सुरू असून २०२४पूर्वी हा मार्ग पूर्ण करण्याचं नियोजन आहे.
- रेल्वे रुळांवरच्या ७ उड्डाणपुलांची कामं हाती घेण्यात आली आहेत.
- वांद्रे, कुर्ला संकुलातील सिटी पार्क ते महाराष्ट्र संकुलातील उद्यानाला जोडण्यासाठीच्या पादचारी पुलासाठी ९८ कोटी ८१ लाखांची तरतूद.
- बीकेसीमधील सायकल मार्गावर बॅटरीवर चालणाऱ्या सायकलींना चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे मुंबईच्या पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्गावर मुंबई महानगर क्षेत्र विकास महामंडळामार्फत सायकलींसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करण्याचे काम हाती घेण्यात येईल.
- मुंब्रा बायपास जंक्शन, शीळ-कल्याण फाटा, शीळ फाटा व कल्याण फाटा जंक्शनवर उड्डाणपूलाची निर्मिती, महामार्गाचे रुंदीकरण, कल्याण फाटा अंडरपासचे काम प्रगतीपथावर आहे.
- मोफत पास योजनेचा लाभ शहरातील मुलींना देणार
- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शिक्षणासाठी मोफत एसटी प्रवास करण्याची योजना शहरी भागातही राबवणार.
- कोल्हापूर विमानतळाला नाईट लँडिंग सुविधेसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला.
- मुंबईसाठी महत्त्वाच्या असलेल्या कोस्टल रोडचं काम २०२४ पूर्वी पूर्ण करणार.
- ठाण्यात ७५०० कोटींचा वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प.
- पुणे, नगर, नाशिक २३५ किमीचा रेल्वे मार्ग उभारणार त्यासाठी १६१३९ कोटींचा निधी मंजूर.
- नागपूर मेट्रो न्यू प्रकल्प हाती घेणार. ठाण्यात ७५०० कोटींचा वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प हाती घेणार.
- राज्यातील अहमदनगर, बीड, परळी, वर्ध्यात रेल्वेमार्गांचे काम वेगाने केले जाणार.
- राज्यातील बस स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी १४०० कोटी रुपयेपरिवहन विभागाला २५०० कोटी रुपयेएलोरोच्या विमानतळाचा विस्तार करणार.
- सोलापुरातल्या बोरामणी विमानतळाचे काम वेगाने करणार.
- समृद्धी महामार्ग आणि नाशिक-मुंबई मार्गावर मेगा इलेक्ट्रीक चार्जिंग सेंटर.
- २५ हजार मेगावॅटचे ऊर्जा प्रकल्प उभारणार.
- ऊर्जा विभागासाठी ९ हजार कोटी रुपयांची तरतूद.
- मुंबई-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला कॅबिनेटची मंजुरी.
- मुंबईतील पूर्वमुक्त महामार्गाला विलासराव देशमुखांचं नाव देण्याची घोषणावसई कल्याण जलवाहतुकीस मंजुरी
- पुणे शहरात नवीन विमानतळ उभारण्यात येणार.
- पुणे-नाशिक या दोन शहरांदरम्यानच्या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी राज्यातकडून १६ १३९ कोटींची तरतूद.
- बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम ४४ टक्के पूर्ण झाले असून, ५०० किमीचा रस्ता १ मेपासून वाहतुकीसाठी खुला केला जाणार.
- नांदेड ते जालना यादरम्यान २०० किमीचा नवीन मार्ग उभारण्यात येणार.
- गोव्याला जाण्यासाठी ५४० किमीच्या समुद्री मार्गासाठी ९५४० कोटी रुपयांची तरतूद
- ५६८९ कोटींच्या रस्त्यांची कामे हाती घेतली जाणार.
- सा.बांधकाम विभागास रस्ते बांधकामासाठी १२,९५० कोटींचा निधी.