विद्यापीठाची अंतिम वर्षाची परीक्षा वा इतर स्पर्धात्मक परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रापर्यंत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबईतील लोकल ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून याबाबतचं परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच विशेष लोकल ट्रेनने प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. ओळखपत्र किंवा हॉल तिकीट दाखवून विद्यार्थ्यांना प्रवासाला परवानगी देण्यात येईल. (Students appearing for final exams and other competitive exams for advance studies allowed to travel in mumbai local train)
विशेष म्हणजे बहुतेक विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परीक्षा आॅनलाईन माध्यामातून घेण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना या सवलतीची फारशी गरज लागणार नाही, अशीच अपेक्षा आहे. परंतु महाराष्ट्र सरकारची मान्यता असलेल्या इतर स्पर्धात्मक (अॅडव्हांस स्टडीज) परीक्षांसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील या सवलतीचा लाभ मिळणार आहे. ही मात्र दिलासादायक बाब आहे. काही दिवसांपूर्वीच जेईई आणि नीट च्या परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील रेल्वे मंत्रालयाकडून रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती.
हेही वाचा - मुंबईतील लोकल ट्रेन, कार्यालयं १ नोव्हेंबरपासून सुरू करा, महापालिकेकडे अहवाल सादर
Students appearing for final exams and other competitive exams for advance studies, please see 👇 pic.twitter.com/hDRhFz1WPd
— Central Railway (@Central_Railway) September 12, 2020
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून परवानगी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या तसंच स्पर्धात्मक परीक्षेच्या विद्यार्थ्यांना विशेष उपनगरीय रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
ओळखपत्र आणि हॉल तिकीटच्या आधारे विद्यार्थ्यांना रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाईल. विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी काही महत्त्वाच्या स्थानकांवर अतिरिक्त बुकिंग काऊंटर्स देखील सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. प्रवास करताना विद्यार्थ्यांना कोरोना संदर्भातील सर्व सुरक्षेच्या नियमांचं पालन करावं लागणार आहे. इतर प्रवाशांनी रेल्वेच्या कुठल्याही स्थानकांवर गर्दी करू नये, असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
महाराष्ट्रामध्ये विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातील परीक्षा आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात येणार आहेत. त्यानंतर आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्याच्या आत सर्व परीक्षांचे निकाल लागणं अपेक्षित आहे. या परीक्षा आॅनलाईन पद्धतीने घेण्याकडेच विद्यापीठांचा कल आहे.
हेही वाचा - किती दिवस लोकल बंद ठेवणार? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल