अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेली तेजस एक्स्प्रेस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सध्या पावसाळा सुरू झाल्याने एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहे. पण तेजस एक्स्प्रेस गोव्याच्या करमाळी स्टेशनवरून मुंबईकडे येण्यासाठी निर्धारित वेळेपेक्षा तीन तास उशिराने निघाली. पण, तरीही ही एक्स्प्रेस वेळेच्या एक मिनिट आधीच मुंबईत पोहचली. त्यामुळे प्रवाशांना सुखद धक्काच बसला आहे.
मान्सून वेळापत्रकानुसार तेजस एक्स्प्रेस करमाळीहून रविवारी सकाळी 7.30 वाजता मुंबईसाठी रवाना होणे अपेक्षित होते. मात्र ती सकाळी 10.30 वाजता रवाना झाली. त्यामुळे तेजसची मुंबईत आगमनाची वेळ वेळापत्रकानुसार रविवारी संध्याकाळी 7.45 मिनिटे असतानाही मुंबईत ती 7.44 म्हणजेच एक मिनीट आधी पोहचली. तेजस एक्सप्रेस ही नेहमीच वक्तशीरपणे धावते, अशी माहिती कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी एल. के. वर्मा यांनी दिली.
मान्सून काळात तेजस एक्स्प्रेस गंतव्य स्थानी 12 ते 15 तासांत पोहचेल, अशा सूचना रेल्वेच्या वतीने प्रवाशांना देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात कोकण मार्गावर कोसळणाऱ्या दरडींमुळे खबरदारी उपाय म्हणून तेजसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. मान्सून वेळापत्रकानुसार तेजस आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे.