रेल्वेच्या हद्दीतील नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाला मुंबई महापालिकेच्यावतीने पैसे दिले जातात. मात्र, आता नाल्यांवरील कल्व्हर्टच्या पुनर्बांधणीसाठीही रेल्वेने पालिकेकडेे पैसे मागितले अाहेत. रेल्वेच्या हद्दीतील नाल्यांचे रुंदीकरण करतानाच कल्व्हर्टचे बांधकाम करणे ही रेल्वेची जबाबदारी आहे. तरीही यासाठी होणारा खर्च पालिकेकडे मागून पावसाच्या पाण्याने रेल्वे मार्गांवर पाणी तुंबलं काय आणि वाहतूक खोळंबली काय याचं आम्हाला सोयर सुतक नसल्याचं दाखवून दिलं अाहे.
मध्य व पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील सर्वंच नाल्यांची सफाई दरवर्षी करण्यात येते. या सफाईसाठी महापालिका दोन्ही रेल्वे प्रशासनाला तीन ते साडेतीन कोटींचा खर्च देते. मात्र, रेल्वे हद्दीतील नालेसफाईबरोबरच या भागातील रेल्वे कल्व्हर्टची देखभाल, दुरुस्ती व पुनर्बांधणीचाही खर्च रेल्वेने मागण्यास सुरुवात केली आहे. या कामांसाठी येणाऱ्या खर्चाची मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनामार्फत आगाऊ मागणी करण्यात येत अाहे.
मध्य व पश्चिम रेल्वे हद्दीत पावसाळ्यात पाण्याचा निचरा योग्य आणि जलद गतीनं होण्यासाठी विविध कल्व्हर्टचे बांधकाम आवश्यक आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीनं रेल्वे प्रशासनाच्या हद्दीमधील कल्व्हर्टचे काम रेल्वे प्रशासनामार्फत करण्यात येते. हा खर्च ५० लाखांपेक्षा असल्यानं ही रक्कम देण्यासाठी स्थायी समितीची मंजुरी मागितली असल्याचं अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प विभागाचे संचालक विनोद चिठोरे यांनी सागितलं. प्रशासनानं अशाप्रकारच्या कामासाठी येणाऱ्या खर्चाची मागणी केल्यानंतर तो खर्च दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.