चेंबूर - गेली कित्येक वर्षे पाणी टंचाईला सामोरे जात असलेल्या चेंबूरवासियांचा पाणीप्रश्न लवकरच सुटण्याची शक्यता आहे. चेंबूर परिसरात चार जलवाहिन्या टाकण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे चेंबूरवासियांना लवकरच मुबलक पाणी मिळण्याची शक्यता आहे.
डंपिंग रोडवरील बैंगनवाडी जंक्शन ते रफीकनगरपर्यंत 750 मिमी आणि 600 मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. तर ज्योतिबा चाळ, महाराष्ट्रनगर येथे 250 मिमी व्यासाची, चिता कॅम्प येथे 300 मिमी व्यासाची आणि चिखलवाडी येथे 150 मिमी व्यासाची अशा एकूण चार जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे 12 कोटी 67 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. यासंबंधीचा प्रस्ताव लवकरच स्थायी समितीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.
या नव्या जलवाहिन्यांमुळे एम-पूर्व विभागातील गोवंडी, मानखुर्द, मंडाला, बीएआरसी कॉलनी, आर.सी. रोड, एचपीसीएल रिफायनरी येथील पाणीप्रश्न सुटेल. तसेच एम-पश्चिम विभागातील डायमंड गार्डन, माहुल गाव, मैसूर कॉलनी, टाटा पॉवर, बीपीसीएल रिफायनरी, पेस्तमसागर, आरसीएफ, छेडानगर, शेल कॉलनी, ठक्कर बाप्पानगर या परिसरातील पाणी टंचाईचा प्रश्न सुटेल, असा दावा पालिकेकडून केला जात आहे.