प्रसिद्ध इंग्रजी साहित्यिका नयनतारा सहगल यांना उद्धाटक म्हणून दिलेलं निमंत्रण रद्द केल्यानं यवतमाळ येथील ९२ वं अखिल मराठी साहित्य संमेलन वादात अडकलं आहे. साहित्य संमेलनासाठी आता केवळ अवघे काही तास उरले असल्यानं सर्वांचंच लक्ष उद्धाटक कोण याकडं लागलं होतं. याचं उत्तर अखेर साहित्य महामंडळाच्या उपाध्यक्षा विद्या देवधर यांनी दिलं आहे. साहित्य संमेलनाचं उद्धाटन यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या विधवा पत्नीच्या हस्ते करण्याचा निर्णय महामंडळानं घेतल्याची माहिती देवधर यांनी गुरूवारी दुपारी दिली आहे.
नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द केल्यानंतर चांगलाच वाद रंगला. निमंत्रण रद्द करण्यास महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी जबाबदार असल्याची टीका होऊ लागली. या टीकेनंतर बुधवारी अखेर श्रीपाद जोशी यांनी आपला अध्यपदाचा राजीनामा दिला. तर उद्धाटक कोण हा प्रश्न अधांतरीच होता. दरम्यान उद्धाटक म्हणून काही नावंही समोर येत होती. साहित्य संमेलन सुरू होण्यासाठी काही तासच उरल्यानं गुरूवारी दुपारी महामंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत उद्धाटकाचा मुद्दा निकाली काढण्यात आला. देवधर यांनी दिलेल्या माहितीनुसार यवतमाळमधील काही संस्थांनी यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या विधवा पत्नीच्या हस्ते उद्घाटन करण्याची मागणी केली होती.
या मागणीनुसार साहित्य महामंडळानं यवतामाळमधील एका आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या विधवा पत्नीच्या हस्ते साहित्य संमेलनाचं उद्घाटन करण्याचा निर्णय घेतल्याचं देवधर यांनी जाहीर केलं आहे. दरम्यान, साहित्य संमेलनाच्या तयारीला आता वेग आला असून यवतमाळ साहित्य संमेलनासाठी सज्ज झालं आहे.
हेही वाचा -
श्रीपाद जोशी यांचा साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
अरूणा ढेरेंनी संमेलनावर बहिष्कार टाकावा - भालचंद्र मुणगेकर