आख्ख्या बॉलिवुडला धक्का बसवणारी घटना म्हणजे अभिनेत्री श्रीदेवी यांचं अकाली निधन. शनिवारी मध्यरात्री उशीरा ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे श्रीदेवी यांची प्राणज्योत मालवली. दुबईमध्ये एका कार्यक्रमासाठी श्रीदेवी गेल्या होत्या. मात्र, नक्की त्यावेळी काय घडलं होतं, हे आता समोर आलं आहे.
श्रीदेवी दुबईमध्ये आपल्या एका स्नेही परिचिताच्या लग्नासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पती बोनी कपूर आणि धाकटी मुलगी खुशी त्यांच्यासोबत होती. कार्यक्रमानंतर बोनी कपूर, खुशी आणि इतर कुटुंबीय मुंबईला परतले. मात्र, श्रीदेवी त्यांच्या काही मैत्रिणींसोबत तिथेच थांबल्या होत्या. यावेळी बाथरूममध्ये गेलेल्या श्रीदेवींचा पाय अचानक घसरला आणि नियतीनं डाव साधला. पाय घसरल्यानंतर बसलेल्या धक्क्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या.
श्रीदेवी पडल्याचं कळताच त्यांच्या मित्रमंडळींनी आसपासच्या लोकांच्या मदतीने त्यांना लागलीच अॅम्ब्युलन्समधून हॉस्पिटलकडे नेण्याची तयारी केली. अॅम्ब्युलन्समध्ये त्यांना नेत असताना वाटेतच त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. हा झटका इतका तीव्र होता की त्या तो सहन करू शकल्या नाहीत आणि तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलेल्या निदानामुळे श्रीदेवी यांच्या कुटुंबीयांना दु:खावेग आवरताच आला नाही. बेशुद्ध अवस्थेतच श्रीदेवी यांना सायलेंट अटॅक आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. यामध्ये कोणत्याही जाणीवेशिवाय त्यांचा मृत्यू ओढवल्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकानेच हळहळ व्यक्त केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीदेवी यांना दाखल केलेल्या दुबईतील रूग्णालयात आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर त्यांचा मृतदेह विशेष जेट विमानाने मुंबईत आणण्यात येणार आहे. त्याआधी दुबईमध्ये त्यांच्या मृतदेहाचं तिथल्या नियमांनुसार शवविच्छेदनही केले जाणार आहे.
सायलेंट हार्ट अटॅकला वैद्यकीय परिभाषेत सायलेंट मायोकार्डियल इन्फॅर्क्शन (SMI) म्हटलं जातं. यामध्ये पेशंटला हार्ट अटॅक आल्याची जाणीव किंवा वेदना छातीत जाणवत नाहीत. त्यामुळे या प्रकारच्या हार्ट अटॅकबद्दल लगेच कळत नाही. मात्र, त्यामुळेच हा हार्ट अटॅक अधिक धोकादायक समजला जातो.
हेही वाचा
दुबईतल्या लग्न सोहळ्यातले श्रीदेवी यांचे अखेरचे क्षण
बिग बींना होती अघटीताची चाहूल? श्रीदेवीच्या निधनासंदर्भात केलं ट्वीट