जगभरात घोंगावत असलेले कोरोना व्हायरसचे सावट पाहता सध्या सर्वच स्तरातील लोक खबरदारीचे उपाय करत आहेत. अनेक देशभरातील लोक गर्दीच्या ठिकाणी न जाणं, तोंडाला मास्क लावणं यांसारख्या गोष्टी करताना दिसत आहेत. त्याचबरोबर गर्दी होतील असे कार्यक्रम, क्रिकेट सामने देखील रद्द करण्यात आले आहेत.
दिग्दर्शक रोहित शेट्टीनं त्याच पार्श्वभूमीवर आपला आगामी ‘सूर्यवंशी’ चित्रपटाचं रिलीज पुढे ढकललं आहे. त्यानं याबाबतची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. येत्या २४ मार्चला अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांची प्रमुख भूमिका असलेली सूर्यवंशी हा चित्रपट रिलीज होणार होता. पण हा चित्रपट आता कधी रिलीज होणार याबाबत कुठलीही माहिती रोहितनं दिलेली नाही.
याबाबतची सविस्तर माहिती सूर्यवंशी चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टीनं ट्विटरच्या माध्यमातून देत या चित्रपटावर आम्ही प्रचंड मेहनत घेतली आहे. ट्रेलर रिलीज होताच प्रेक्षकांनीही आमच्या या मेहनतीला भरभरुन दाद दिली. पण सध्या देशभरात कोरोना व्हायरसचे सावट असल्यामुळे चित्रपटाची रिलीज डेट आम्ही पुढे ढकलल्याचं म्हटलं आहे.
For the Safety and Health of Audiences, Release of #Sooryavanshi postponed ! @karanjohar @akshaykumar #KatrinaKaif @RelianceEnt @AmbaniTina @CapeOfGoodFilms for keeping public health and Safety above commerce pic.twitter.com/DkqfncXe9f
— Rohit Shetty (@iaRohitShetty) March 12, 2020
नुकतीच उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात एक पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे, मुंबई, नवी मुंबई, नागपूर इथले जीम, थिएटर्स, स्वीमिंग पूल बंद ठेवण्यात येणार आहेत. मॉल, हॉटेल्स रेस्टॉरंट्स बंद नाहीत. पण तिथे जाणं टाळा, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
सार्वजनिक जत्रा, धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रमांना सरकार परवानगी देणार नाही. पूर्वी दिलेली परवानगी रद्द करण्यात येईल. जिथे शक्य आहे, त्या सर्व खासगी संस्थांना वर्क फ्रॉम होम करण्यासंदर्भातली मुभा द्यावी ही अधिसूचना मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली आहे.
सध्या महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा १७ वर पोहोचला आहे. मुंबईत ३ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारनं मुंबईतील माॅल्स, चर्चगेट रेल्वे स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह इतर रेल्वे स्थानकांवरही सॅनिटायझर आणि मास्क (sanitizer and mask) पुरविण्याचं ठरवलं आहे, असं अस्लम शेख यांनी सांगितलं.
मास्कपेक्षा लोकांना स्वच्छतेसाठी सॅनिटायझरची जास्त गरज असल्यानं सुरुवातीला जास्तीत जास्त लोकांना सॅनिटायझरचे वाटप करण्यात येईल. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मास्क पुरवण्याबाबत अद्याप शासनानं कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्याबाबत लवकरच माहिती देण्यात येईल, असंही शेख (mumbai guardian minister aslam sheikh) यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा