काही वर्षांपूर्वीपर्यंत ज्यांचं आपसात पटत नव्हतं, ते तीन खान म्हणजेच आमिर, सलमान आणि शाहरुख यांचं नुकतंच मन्नतवर एक छोटेखानी गेट टुगेदर झालं. या खास गेट टुगेदरमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली आणि या मागील रहस्य काय याचीच सध्या बॅालिवुडमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीवर आजही आमिर, सलमान आणि शाहरुख या तीन खानांचं राज्य असल्याचं मानलं जातं, पण मागील वर्ष या खानांसाठी काही चांगलं नव्हतं. अशातच तिघांनीही एकमेकांची भेट घेतल्यानं इतरांना चर्चेसाठी खाद्य मिळालं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या भेटीमध्ये मनसोक्त चर्चेसोबतच गुड फुड आणि ड्रींक्सवर ताव मारण्यात आला. सूत्रांच्या म्हणण्यानुसार रात्री ८ वाजेपर्यंत चाललेल्या या भेटीमध्ये तिन्ही खानांनी आपापल्या करियरवर चर्चा केली.
इतकंच नव्हे तर भविष्यात एकत्र येऊन एखादा महत्त्वपूर्ण प्राजेक्ट करण्यावरही शाहरुख, आमिर आणि सलमान यांच्यात चर्चा झाली असण्याची शक्यताही सूत्रांकडून वर्तवली जात आहे. हे जर खरं ठरलं तर तिन्ही खानांच्या चाहत्यांसाठी ही सर्वात मोठी खुशखबर ठरणार आहे. यापूर्वी आमिर, सलमान आणि शाहरुख यांनी कधीही एकत्र काम केलेलं नाही. त्यामुळं खरोखर भविष्यात हा चमत्कार घडतो का ते पाहायचं आहे.
२०१८ हे वर्ष शाहरुख आणि आमिरसाठी खूप महत्त्वाचं होतं, पण दोघांनाही अपेक्षेनुसार यश मिळालं नाही. गत वर्षी प्रदर्शित झालेला शाहरुखचा 'झीरो' बॅाक्स आॅफिसवरही 'झीरो'च ठरला. आमिरच्या 'ठग्ज आॅफ हिंदोस्थान'कडून खूप अपेक्षा होत्या, पण त्याही पूर्ण होऊ शकल्या नाहीत. या तुलनेत सलमानच्या 'रेस ३' नं ३०० कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला. कदाचित याच कारणामुळं तिन्ही खान 'सबका साथ, सबका विकास' या मंत्रानुसार भविष्यात एकत्र येऊन काहीतरी करण्याच्या विचारात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा -
सलमान खानच्या 'तेरे नाम'चा सीक्वेल येणार
श्रद्धा कर्जतमध्ये करतेय 'साहो'चं शूटिंग