कोरोना व्हायरसाचा मोठा फटका देशातील वाहन कंपन्यांना बसला आहे. लाॅकडाऊनमुळे मार्च महिना वाहन क्षेत्रासाठी खूपच वाईट ठरला आहे. मार्चमध्ये देशांतर्गत प्रवासी वाहन्यांच्या विक्रीत तब्बल ५१ टक्के घसरण आली आहे. मार्च महिन्यात देशात १.४३ लाख गाड्यांची विक्री झाली आहे. मार्च २०१९ मध्ये २.९१ लाख गाड्यांची विक्री झाली होती. सोसायटी आॅफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स(सियाम) ने जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे.
सियामच्या आकडेवारीनुसार, विक्री घटल्यामुळे वाहन निर्मात्या कंपन्यांना रोज २३०० कोटी रुपयांचं नुकसान होत आहे. वाहन उद्योगाने मार्च २०२० मध्ये प्रवासी वाहन, व्यावसायिक वाहन, तीनचाकी, दुचाकी आणि चारचाकीसह एकूण १४.४७ लाख वाहनांचे उत्पादन केले. गेल्या वर्षी या कालावधीत २१.८० लाख गाड्यांचे उत्पादन झाले होते. कोरोना विषाणू संकटामुळे कंपन्यांनी मॅन्युफॅक्चरिंग युनिट बंद करण्याची घोषणा केली.
व्यावसायिक वाहनांची विक्री मार्च २०२० मध्ये ८८.०५ टक्के घटली आहे. गेल्या वर्षी मार्च २०१९ मध्ये १.०९ वाहनांची निर्मिती झाली होती. या मार्चमध्ये १३,०२७ गाड्या तयार झाल्या. मार्च २०२० मध्ये तीनचाकी वाहनांची विक्री ५८.३४ टक्के घटून २७,६०८ राहिली. मार्च २०२० मध्ये दुचाकी वाहनांची विक्रीही ३९.८३ टक्के घटून ८.६६ लाख युनिट राहिली. मार्च २०१९ मध्ये १४.४० लाख युनिटची निर्मिती झाली होती.
सियामच्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये एकूण वाहनांच्या विक्रीत १८ टक्के घसरण नोंदली आहे. उत्पादनही १५ टक्के घटून २६,३६२,२८४ युनिट राहिले. प्रवासी वाहनांची विक्री १७.८२ टक्के घटून २,७७५,६७९ युनिट राहिली. व्यावसायिक वाहनांची विक्री २८.७५ टक्के घटून ७१७,६८८ युनिट राहिली.
हेही वाचा -