अर्थ मंत्रालयाने बँक आॅफ बडोदा, विजया बँक आणि देना बँकेच्या विलिनीकरण प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या मंजुरीनंतर १ एप्रिलपासून या तिन्ही बँकांच्या विलिनीकरणाला सुरूवात होईल, असं म्हटलं जात आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ संपण्याच्या आत विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलं आहे.
चालू महिन्यातच तिन्ही बँकांच्या संचालक मंडळाची बैठक होईल. या बैठकीत बँकांच्या विलिनीकरणाची योजना बनवण्यात येईल. सोबतच शेअर्सची देवाण-घेवाण, निधीची उपलब्धता, खात्यांचा तपशील यावरही तपशीलात काम करण्यात येईल.
अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सोमवारी या तिन्ही बँकांच्या विलिनीकरणाचा निर्णय घेतला होता. या विलिनीकरणातून एकच मोठी बँक तयार होणार असून ही बँक देशातील तिसरी सर्वात मोठी बँक असणार आहे.
गेल्या वर्षी सरकारने देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकेत तिच्या ५ सहयोगी बँका आणि महिला बँकेचं विलिनीकरण केलं होतं. यानंतर स्टेट बँक जगातील ५० मोठ्या बँकांच्या यादीत सामील झाली. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना २०१७-१८ मध्ये ८७, ३५७ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला होता. सार्वजनिक क्षेत्रातील २१ बँकांपैकी इंडियन बँक आणि विजया बँक सोडून इतर सर्वच बँकांना तोटा सहन करावा लागला होता.
हेही वाचा-
देशात तिसरी मोठी बँक उदयाला येणार
सोन्या-चांदीला झळाळी, किती रुपयांनी महागलं? वाचा...