मुंबईतील मरिन ड्राइव्ह इथं असलेली एअर इंडिया या सरकारी विमान कंपनीची इमारत राज्य सरकारच्या मालकीची होण्याची शक्यता आहे. या इमारतीसाठी राज्य सरकारनं तब्बल १४०० कोटी रुपयांची बोली लावली आहे. परंतु, राज्य सरकारकडून लावण्यात आलेली बोली ही एअर इंडियानं निर्धारित केलेल्या आरक्षित मूल्यापेक्षा २०० कोटींनी कमी असल्याची माहिती समोर येत आहे. तरीही राज्य सरकारनं दिलेल्या प्रस्तावावर एअर इंडिया सकारात्मक असल्याचं समजतं आहे. याआधी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) आणि भारतीय आयुर्विमा महामंडळानं (एलआयसी) अनुक्रमे १ हजार ३७५ कोटी आणि १ हजार २०० कोटी रूपयांची बोली लावली होती.
एअर इंडिया या सरकारी विमान कंपनीच्या इमारतीसाठी याआधी झालेल्या लिलावाच्या प्रक्रियेत केवळ एलआयसीकडूनच बोली लावण्यात आली होती. लिलाव प्रक्रियेत एकाच कंपनीनं सहभाग घेतल्यानं पुन्हा एकदा लिलावाची प्रक्रिया पार पडली. त्याशिवाय, या प्रक्रियेत सरकारी संस्थांनाच भाग घेता येईल, अशी अट घालण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्र सरकारकडून १ हजार ४०० कोटींची बोली लावण्यात आली होती.
२०१३ साली एअर इंडियाचं मुख्यालय दिल्लीमध्ये हलवण्यात आलं होतं. त्यानंतर मुंबईतील एअर इंडियाच्या इमारतीतील २३ मजल्यापैकी १७ मजले एअर इंडियानं भाडेतत्वावर दिले होते. मात्र, एअर इंडियानं नव्यानं करार न करण्याची विनंती देखील राज्य सरकारनं केली आहे.
हेही वाचा -
हिमालया दुर्घटनेनंतर फेरतपासणीत आणखी ६ पूल धोकादायक
अभिनेता करण सिंग ओबेराॅय बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत