इंधनाच्या दरांनी शंभरीकडे पोहोचण्यासाठी वाटचाल सुरूच ठेवली आहे. कारण पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये शनिवारी पुन्हा एकदा वाढ झाली आहे. शनिवारी पेट्रोल प्रति लिटर ३४ पैशांनी, तर डिझेल प्रति लिटर २५ पैशांनी महागलं आहे. या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोल प्रति लिटर ८९.०१ रुपयांवर आणि डिझेल प्रति लिटर ७८.०७ रुपयांवर जाऊन पोहोचलं आहे. एवढंच नव्हे, तर गोंदिया, मनमाडमध्ये पेट्रोलने नव्वदीचा आकडा गाठला आहे.
सलग १७ दिवस इंधनाच्या दरांमध्ये वाढ झाल्याने सर्वसामान्य चिंताग्रस्त झाले होते. बुधवारी इंधनाच्या दरांत कुठलीही वाढ झाली नाही. परंतु पुन्हा गुरुवारी पेट्रोल १३ पैशांनी, तर डिझेल ११ पैशांनी महागलं आणि शुक्रवारी पेट्रोल २८ पैशांनी, तर डिझेल २४ पैशांनी महागलं. त्यात पुन्हा शनिवारी भर पडली आहे.
इंधन दरवाढीचा निषेध करत काँग्रेससह विरोधकांनी 'भारत बंद' पुकारत पेट्रोल आणि डिझेलचे दर जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी ''इंधनाचे दर आटोक्यात ठेवणं केंद्र सरकारच्या हातात नाही'', असं म्हणत हात वर केले होते.
हेही वाचा-
देशात प्रथमच पेट्रोल ९० रुपयांवर