भारतीय बँकांचं ९,५०० हजार कोटी रुपयांहून अधिक कर्ज थकवून परदेशात पळ काढणारा मद्यसम्राट विजय मल्ल्याला अखेर फरार घोषित करण्यात आलं आहे. विशेष पीएमएलए न्यायालयानं शनिवारी याबाबत निर्णय दिला असून यामुळ सक्तवसुली संचालनालय (ईडी) चा संपत्ती जप्त करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याशिवाय नवीन कायद्यातंर्गत फरार घोषित करण्यात आलेला मल्ल्या हा पहिलाचा उद्योगपती ठरला आहे.
आर्थिक घोटाळे करून देशाबाहेर पलायन करणाऱ्या आरोपींना चाप लावण्यासाठी केंद्र सरकारनं हा नवा कायदा केला असून त्यानुसार न्यायलयीन प्रक्रिया टाळणाऱ्या आरोपींना न्यायलयाकडून परागंदा अार्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात येते. त्यानंतर तात्काळ या आरोपींची संपत्तीही जप्त केली जाते. जवळपास १०० कोटीहून अधिक रकमेचा घोटाळा करणारे या कायद्यातंर्गत येत असून कारावाई होईल म्हणून भारतात येण्यास नकार देणाऱ्या आरोपींना हा कायदा लागू होतो.
या कायदातंर्गत विजय मल्ल्याला परागंदा आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याची विनंती ईडीनं सुनावणीदरम्यान विशेष पीएमएलए न्यायलयाला केली होती. त्यावेळीच्या सुनावणीत विशेष पीएमएलए न्यायलयाचे न्यायाधीश एम. एस. आझमी यांनी निर्णय राखून ठेवला होता. त्याबाबत शनिवारी झालेल्या पुढील सुनावणीत विशेष पीएमएलए न्यायलयानं मल्ल्याला फरार घोषित केलं आहे. त्यानुसार आता पुढील सुनावणीत मल्ल्याच्या सर्व मालमत्तांची यादी जाहीर करण्याबरोबरच त्याची जप्ती तसेच विल्हेवाट लिलावाद्वारे की अन्य प्रकारे लावायची याबाबत निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.
विजय मल्ल्या मार्च २०१६ पासून ब्रिटनमध्ये असून १८ एप्रिलला स्काॅटलँड यार्ड पोलिसांनी प्रत्यार्पण वाॅरंटवर त्याला अटक केली होती. त्यानंतर त्याला तात्काळ जामिनावर सोडून देण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी मल्ल्यानं ट्विट करत कर्ज फेडण्याची तयारी दाखवली होती. परंतु मी फक्त १०० टक्के मुद्दल फेडेन; पण व्याज देणार नाही. अशी अट त्यानं ठेवली होती.
हेही वाचा -
Good News! तिकीट झाले स्वस्त, सिनेप्रेमींना नववर्षाची भेट