अपघात रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून अथक प्रयत्न सुरू असताना रेल्वेच्या पश्चिम, हार्बर आणि मध्य रेल्वे मार्गावर सोमवारी एका दिवसात 12 जणांचा अपघाती मृत्यू झाला. तर 5 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती रेल्वे पोलिस आणि जीआरपीने दिली आहे.
एका रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ट्रॅक ओलांडताना, लोकलमधून पडून, आत्महत्या करून आणि ट्रेन-फलाटच्यामध्ये अडकून 12 जणांचा मृत्यू झाला.
रेल्वे पोलिसांच्या मृत्यू आणि अपघातांच्या दैनिक अहवालानुसार ठाणे आणि कल्याण स्थानकात सोमवारी रेल्वे रुळ ओलांडताना तीघांचा मृत्यू झाला. तर मुंबईच्या वाडाळा रेल्वे स्थानकात झालेल्या अपघातात दोघे मृत पावले. तर कुर्ला, मुंबई सेंट्रल आणि वांद्रे रेल्वे स्थानकात रुळ ओलांडताना तिघांचा बळी गेला.
मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असलेली उपनगरीय रेल्वे ही देखील आता प्रवाशांसाठी जीवघेणी ठरत आहे. कारण 2017 मध्ये शहरात रेल्वे मार्गावर वेगवेगळ्या ठिकणी झालेल्या अपघातात 3,014 लोकांनी आपला जीव गमवला.