येणारा विकेंड मुंबईकरांसाठी थोडा त्रासदायक ठरू शकतो. कारण मुंबईतील काही भागांमध्ये ३० तास पाणीकपात होण्याची शक्यता आहे. वांद्रा, माटुंगा आणि धारावी परिसरात शुक्रवार सकाळपासून शनिवारपर्यंत पाणीकपात होणार आहे.
या परिसरातील एका जलवाहिनीच्या दुरूस्तीसाठी ही पाणीकपात करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार सकाळी १० वाजेपासून ते शनिवार सायंकाळ ४ वाजेपर्यंत जलवाहिनीच्या दुरूस्तीसाठी पाणीकपात करण्यात येणार आहे. त्यामुळे वांद्रे रेल्वे टर्मिनस, माटुंगा लेबर कॅम्प आणि धारावी परिसरातील काही भागात पाणीपुरवठा बंद राहील. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी आपल्या गरजेनुसार पाणी साठवून ठेवावं तसंच पाण्याचा अपव्यय करू नये.
सोबतच, सांताक्रूझ पूर्वेकडील टिचर्स काॅलनीजवळील २४०० व्यासाच्या जलवाहिनीच्या दुरूस्तीचा प्रस्ताव देखील महापालिकेने सादर केला आहे. ही जलवाहिनी अप्पर वैतरणा येथून मुंबईत पाणीपुरवठा करते. मात्र दुरूस्तीचं हे काम शुक्रवारी होईल किंवा अन्य तारखेला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
हेही वाचा-
धोकादायक ठरलेल्या ७ पुलांची लवकरच होणार पुनर्बांधणी
पार्किंगची सुविधा असलेल्या वाहनतळांपैकी १४ वाहनतळांचा कमी वापर