राज्य लवकरच प्लास्टिक मुक्त होणार, अशी घोषणा नुकतीच राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली होती. 'त्या दृष्टीने आता पर्यावरण विभागाचे अधिकारी देखील कामाला लागले आहेत' अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली.
मुंबईसह राज्यात सध्या प्लास्टिक समस्या मोठ्या प्रमाणात आहे. हजारो टन प्लास्टिकचा कचरा शहरी भागात जमा होतो. त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होते. येत्या गुढीपाडव्यापासून राज्यात संपूर्ण प्लास्टिकबंदी करणार असल्याची घोषणा झाल्यानंतर या अंमलबजावणीसाठी विभागाकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी आता या विभागाच्या एकूण ४ समित्या मंगळवारी २३ नोव्हेंबरपासून देशातील ४ राज्यांच्या अभ्यास दौऱ्यावर निघणार आहेत.
हिमाचल प्रदेश, सिक्कीम, मध्यप्रदेश आणि कर्नाटक राज्यांचा दौरा या ४ समित्या करणार आहेत. पर्यावरण विभागाचे संचालक बी. एम. पाटील, डॉ. यशवंत सोनटक्के, पुंडलिक मिरासे, नंदकुमार गुरव या ४ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हा दौरा निघणार आहे.
या चारही समित्या त्या क्षेत्रात प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी कशी होते, प्लॅस्टिकला पर्यायी वापर काय आहे, प्लास्टिक वापरल्यानंतर शिक्षेची काय तरतूद आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास करणार आहेत. अभ्यास करून एकत्रित अहवाल सादर करणार असल्याची माहिती कदम यांनी दिली.
हेही वाचा -
प्लास्टिक मुक्त मुंबई करण्याचा निर्धार...