मुंबईतील वाहतुक कोंडीमुळे मुंबईकर हैराण झाले असून ही वाहतुक कोंडी बऱ्याचदा मुंबईच्या वेगालाच ब्रेक लावते. पण आता या वाहतुक कोंडीनं चक्क ४० तरुणांच्या करिअरला ब्रेक लावला आहे. सकाळी पवईत नोकरीसाठीच्या परीक्षेला जाणाऱ्या ४० तरूणांना वाहतुक कोंडीचा चांगलाच फटका बसला आहे. पवईला जाणाऱ्या जेव्हीएलआर मार्गावरील प्रचंड वाहतुक कोंडीमुळे ४० तरूण परीक्षेला वेळेत पोहचू शकले नाहीत. उशीरा पोहचल्यानं या तरूणांना परीक्षेला बसू दिलं नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. तर परीक्षा देता न आल्यानं त्यांची नोकरीची संधी हुकली आहे आणि तीही केवळ आणि केवळ मुंबईतील वाहतुक कोंडीमुळे.
मुंबईत दररोज सरकारी आणि खासगी नोकऱ्यांसाठी परीक्षा होत असतात. त्यानुसार बुधवारी, ३० जानेवारीला सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी न्यू इंडिया अॅश्यूरन्सच्या असिस्टंट आॅफिसरच्या पदासाठी परीक्षा होणार होती. तर पवईमधील एका परीक्षा केंद्रावर ही परीक्षा पार पडणार होती. दरम्यान पश्चिम उपनगरातून असो वा मध्य उपनगरात वा शहरातून पवईत पोहचणं म्हणजे एक दिव्यचं असतं. कारण पवईला जाणाऱ्या सर्वच रस्त्यांवर नेहमीच, त्यातही गर्दीच्या वेळेस प्रचंड वाहतुक कोंडी असते. त्यातच पवईमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर खासगी कंपन्या आणि खासगी कार्यालयांची संख्या वाढल्यानं दिवसेंदिवस वाहतुक कोंडी वाढत असून पवईला पोहचणं अवघड होताना दिसत आहे.
बुधवारी सकाळी पवईतील परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी निघालेल्या मुंबईसह गावावरून आलेल्या तब्बल ४० तरूणांना पवईला पोहचणं किती आणि कसं अवघड आहे याचा प्रत्यक्ष अनुभव आला. जेव्हीएलआर मार्गावर प्रचंड वाहतुक कोंडी असल्यानं मुंबईतील वेगवेगळ्या भागातून पवईच्या दिशेने निघालेल्या ४० तरूणांना परीक्षेच्या वेळेत परीक्षा केंद्रावर पोहचता आलं नाही. पोहचण्यास ५ ते १० मिनिटांचा उशीर झाल्यानं त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे त्यांची नोकरीची संधी हुकली आहे. वाहतुक कोंडीचा फटका एकाच वेळी ४० तरूणांना बसण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी.
मी माझ्या बहिणीला बाईकवरून पवईला परीक्षेसाठी घेऊन निघालो होतो. सव्वा नऊची वेळ असल्यानं वेळेत पोहचण्याचा आमचा प्रयत्न होता. जेव्हीएलआरवरील प्रचंड वाहतुक कोंडीमुळं आम्हाला सव्वा नऊची वेळ साधता आली नाही. पण अर्धा तास उशीरा पोहचण्याची मुभा असल्यानं पावणे दहापर्यंत तरी पोहचू असं आम्हाला वाटत होतं. पण वाहतुक कोंडीमुळे आम्ही पावणे दहापर्यंतही पोहचू शकलो नाही. आम्हाला ५ ते ६ मिनिटांचा उशीर झाला नि माझ्या बहीणीला परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आला.
- संकेत घोडके, विद्यार्थिनीचा भाऊ
तसेच संकेतच्या बहिणीबरोबर मुंबईसह परभणी, अमरावती यांसह अन्य भागातून उमेदवार परीक्षेसाठी आले होते. परंतु मुंबईतील वाहतुक कोंडीमुळे त्यांना परीक्षेस पोहोचण्यास उशीर झाला. यामुळं परीक्षेसाठी आलेले अनेक उमेदवार गेटवर उभे होते. ही संख्या मोठी असल्यानं संबंधितांकडे परीक्षेला बसण्याची विनंती करण्यात आली, पण ही विनंती धुडकावून लावण्यात आल्याचंही परभणीतून आलेल्या विद्यार्थ्यानं सांगितलं. त्यामुळेच या विद्यार्थ्यांनी सोशल मिडीया आणि प्रसारमाध्यमांकडे धाव घेत आपली कैफीयत मांडली आहे.
हेही वाचा -
नाशिककरांची 'दिल्ली'वारी सुकर! लवकरच मध्य रेल्वेवर रोज धावणार राजधानी एक्सप्रेस