Advertisement

मुंबईतून बेवारस वाहनांचं सहा लाख किलो भंगार साफ!


मुंबईतून बेवारस वाहनांचं सहा लाख किलो भंगार साफ!
SHARES

एकीकडे मुंबईत पार्किंग आणि मोकळ्या जागांची समस्या गंभीर बनत चाललेली असताना दुसरीकडे बेवारस वाहनांनी बरीच जागा अडवून ठेवली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शहरात अनेक ठिकाणी अशी बेवारस वाहने पडून आहेत. अशाच वाहनांच्या विरोधात मुंबई महापालिकेने कारवाई करुन तब्बल दीड कोटींचा महसूल वसूल केला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून ही वाहने पडून असून त्यांचा कोणीही वारसदार पुढे येत नव्हता. गेल्या दीड वर्षांतच तब्बल 3 हजार 500 वाहने पडून असल्याचं आढळून आलं होतं. त्यात सुमारे पावणे तीन हजार वाहने ही बेवारस होती. अशा वाहनांचा अखेर पालिकेकडून भंगारात काढून लिलाव करण्यात आला. या लिलावातून तसेच, अनेक वाहनांवर आकारण्यात आलेल्या दंडाच्या रकमेतून मुंबई महापालिकेला तब्बस दीड कोटींचा महसूल मिळाला आहे.


२७४७ वाहने बेवारस

मुंबईतील सार्वजनिक जागी किंवा रस्त्यावर सोडून दिलेली वाहने महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन खात्याद्वारे जप्त करण्यात येतात. यानुसार १ जानेवारी २०१६ ते ३० जून २०१७ या दरम्यान ३ हजार ४१८ वाहने जप्त करण्यात आली होती. यापैकी ८० टक्कयांपेक्षा अधिक म्हणजेच २ हजार ७४७ वाहने सोडवून घेण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. त्यामुळे या वाहनांचा नुकताच लिलाव करण्यात  आला. उपायुक्त (अतिक्रमण निर्मूलन) रणजित ढाकणे यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात आलेल्या या लिलावातून महापालिकेला ९५ लाख ९६ हजारांचा महसूल प्राप्त झाला. तर याच कालावधीदरम्यान संबंधितांद्वारे सोडविण्यात आलेल्या ६१२ वाहनांच्या दंडापोटी महापालिकेला ४६ लाख २६ हजार ३९० रुपयांची प्राप्ती झाली आहे, अशी माहिती अतिक्रमण निर्मूलन खात्याचे सहाय्यक आयुक्त विश्वास शंकरवार यांनी दिली आहे.


डेंग्यू मलेरियामुळे कारवाई

बेवारस भंगारातील वाहनांमुळे रस्त्यावरील वाहतुकीला देखील अडथळा  होतो, तसेच या वाहनांच्या टपावर किंवा वाहनांमध्ये पाणी साचून त्यात डेंग्यू - मलेरियाचा प्रसार करणा-या डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशी वाहने महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलने खात्याद्वारे मुंबई महापालिका अधिनियम कलम ३१४ नुसार जप्त करण्यात आली. महापालिकेने जप्त केलेल्या वाहनांपैकी जी वाहने सोडवून घेण्यासाठी कोणीही पुढे येत नाही, अशा वाहनांच्या बाबतीत महापालिका अधिनियम कलम ४९० (३) प्रमाणे वजनानुसार लिलाव केला जातो. यानुसार २ हजार ७४७ वाहनांचा नुकताच लिलाव करण्यात आला. तर उर्वरित ५९ वाहने ही विविध पोलीस खटल्यांशी संबंधित असल्याने लिलावातून वगळण्यात असल्याचे शंकरवार यांनी स्पष्ट केले.


६ लाख किलोचे भंगार


वाहने
संख्या
वजन (किलोमध्ये)
दुचाकी
१ हजार ९७६
१ लाख ९४ हजार ६०० किलो
तीनचाकी
२४३
६५ हजार ५७० किलो
चारचाकी
५२८
३ लाख ३४ हजार ९५० किलो
एकूण
२ हजार ७४७
५ लाख ९५ हजार १२० किलो


हा लिलाव 'ऑनलाईन लिलाव' (e-auction) पद्धतीने आयोजित करण्यात आला होता. यानुसार ९५ लाख ९६ हजार रुपये एवढ्या अंतिम बोलीला या वाहनांची विक्री झाली आहे. तर संबंधितांद्वारे सोडविण्यात आलेल्या वाहनांपोटी ४६ लाख २६ हजार ३९० रुपये एवढी दंड रक्कम महापालिकेकडे जमा झाली आहे. याप्रमाणे दंड व लिलाव याद्वारे महापालिकेकडे १ कोटी ४२ लाख २२ हजार ३९० रुपये एवढी रक्कम जमा झाली आहे.


जानेवारी २०१६ ते  जून २०१७ पर्यंतची जप्त केलेली वाहने

  • २,२१७ दुचाकी
  • ३०० तीन चाकी
  • ९०१ चार चाकी


६१२ सोडवलेली वाहने

  • १९३ दुचाकी
  • ५० तीनचाकी
  • ३६९ चारचाकी
  • ४६ लाख २६ हजार ३९० रुपये दंडापोटी जमा



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा