पावसाळ्यात मुंबईतील सखल भागात पाणी साचतं. त्यामुळं रस्ते वाहतूक विस्कळीत होते. मात्र, मुंबईतील संखल भागांत पाणी साचू नये यासाठी महापालिका दरवर्षी पावसाळ्या पूर्वी नाल्यांची सफाई, रस्त्यांची उर्वरित कामं करते. यंदाही पावसाळ्याला अवघे ३ महिने उरले असताना महापालिका प्रशासनानं रस्ते कामांचा बार उडवून देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी स्थायी समितीनं ६३२ कोटींच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे.
मुंबईतील रस्त्यांच्या कामांचा प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याची विनंती प्रशासनानं स्थायी समितीला केली. महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी याबाबत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना पत्र देऊन मुंबई विभागातील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण, रस्त्याच्या साइड स्ट्रिप आणि सीसी पॅसेजची सुधारणा करण्याचं प्रस्ताव मंजूर करण्याची लेखी विनंती केली.
रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे ६३२ कोटींचे प्रस्ताव असे घाईघाईने मंजूर करण्यास भाजपने आक्षेप घेतला. कोरोनाचं कारण देत प्रस्ताव मंजूर करण्याची प्रशासनाची मागणी स्थायी समितीनं मान्य केली. त्यामुळं नाराज भाजप सदस्यांनी सभात्याग केला. परंतु, रस्त्यांची कामे करण्यास ३१ मेपर्यंतची मुदत असल्यानं ही कामं प्रत्यक्षात पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता आहे.
रस्ते कामांची कोणतीही तातडीची गरज नसल्याचं भाजपच्या सदस्यांनी मत व्यक्त करीत कोरोनाच्या नावाखाली प्रशासन दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला. काँग्रेस, राष्ट्रवादीनंही भाजपच्या हरकतीच्या मुद्द्याला समर्थन देत प्रस्ताव मंजूर करण्याची घाई करू नये, अशी मागणी केली. परंतु, सत्ताधारी शिवसेनेनं ५ प्रस्ताव बहुमतानं मंजूर केल्यानं भाजप सदस्यांनी सभात्याग केला.
रस्त्यांची कामं
हेही वाचा -
Coronavirus Updates: राज्यातील काही शाळा, कॉलेजांमध्ये परीक्षा अद्याप सुरूच
Coronavirus Updates: उपाययोजनेसाठी निधी खर्च करण्याचे महापालिका आयुक्तांना विशेषाधिकार