अनेकदा बरीच लहान मुलं कुटुंबीयांचा राग आल्यानं घर सोडून जातात, तर काही मुलं अन्य कारणांसाठी घर सोडतात. मात्र, घर सोडल्यानंतर या मुलांना पुन्हा घरी परतता येणं शक्य होत नाही. त्यामुळं ही मुलं रेल्वे स्थानकांवर भटकताना दिसतात. परंतू, अशा एकूण ७१८ बेघर झालेल्या मुलांची पश्चिम रेल्वेनं घरवापसी केली आहे. पश्चिम रेल्वे सुरक्षा दलानं (आरपीएफ) राज्य पोलीस, गुप्तहेर संस्था, स्वयंसेवी संघटना यांच्या समन्वयानं मार्च २०१८ ते मार्च २०१९ दरम्यान बेघर झालेल्या तब्बल ७१८ मुलांची घरवापसी केली आहे. तसंच, १ एप्रिल ते २० मे दरम्यान ६६ मुलांची सुटका केली आहे.
पश्चिम रेल्वेच्या चाइल्ड हेल्पलाइननं महत्त्वाची भूमिका निभावली आहे. दरम्यान, बेघर झालेली मुलं तस्करीला बळी पडतात. त्याशिवाय अनेक मुलं रेल्वे स्थानकावर भटकताना दिसतात. अशा एकूण ७१८ बेघर मुलांची सुटका पश्चिम रेल्वेनं केली आहे. यामध्ये मुंबई सेंट्रल विभागातून ३८१, बडोदा ७१, अहमदाबाद ४४, रतलाम १७४, राजकोट २३ आणि भावनगर विभागातून २५ मुलांची सुटका केल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.
पश्चिम रेल्वेच्या चाइल्ड हेल्पलाइनमार्फत एक मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेर्तंगत हरवलेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवण्यात येते. तसंच, या चाइल्ड हेल्पलाइनतर्फे एखादा मुलगा संकटात असल्याचं आढळल्यास त्याच्या गरजा पूर्ण करण्यासोबतच तो चुकीच्या व्यक्तीकडं जाणार नाही याची काळजी घेतली जाते.
पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, सुरत, बडोदा, अहमदाबाद, रतलाम आणि राजकोट स्थानकांवर चाइल्ड हेल्पलाइन डेस्कची स्थापना करण्यात आली आहे. या मुलांच्या सुरक्षेसाठी रेल्वेद्वारा महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या मदतीनं उपाययोजना करण्यात येत आहे.
हेही वाचा -
गोरेगाव स्थानकात तांत्रिक बिघाड, रेल्वे वाहतूक उशीरानं
जोगेश्वरीमध्ये सिलेंडरचा स्फोट, १३ जण गंभीर जखमी