वांद्रे-वरळी सी लिंक वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून (bmc) देण्यात आली आहे. तौंते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून सोमवारी हा महत्त्वाचा मार्ग बंद ठेवण्यात आला होता. उधाणलेल्या समुद्रात उंचच उंच लाटा दिवसभर सी लिंकला येऊन धडकत होत्या.
गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला तडाखा दिल्यानंतर रविवार पासूनच मुंबईच्या किनारपट्टीवर तौंते चक्रीवादळामुळे जोरदार वारे वहात होते. मुंबईच्या अरबी समुद्रातून हे वादळ गुजरातच्या दिशेने जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. सोबतच या चक्रीवादळाचा तडाखा मुंबईलाही बसू शकतो, अशी शक्यता आधीच वर्तवण्यात आली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून वरळी-वांद्रे सी-लिंक सोमवार सकाळपासून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.
हेही वाचा- Cyclone Tauktae : मुंबईत मे महिन्यात पावसाचा सर्वाधिक विक्रम
मुंबईकरांनो,
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 18, 2021
वांद्रे - वरळी सी लिंक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
तथापि अत्यावश्यक नसल्यास घरीच रहा, सुरक्षित रहा.#MyBMCUpdates#CycloneTauktaeUpdates
सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस यामुळे मुंबई विमानतळावरील सर्व विमानांचं उड्डाण देखील बंद करण्यात आलं होतं. तब्बल ११ तासांहून अधिक काळ मुंबई विमानतळावरील धावपट्टी बंद ठेवण्यात आली होती.
सोमवारचा दिवस हा मुंबईसाठी (mumbai) मे महिन्यातील विक्रमी पावसाचा दिवस ठरला. सोमवारी मुंबईला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं. मुंबईत सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सरासरी १९४ मिमी पाऊस झाला. तर सरासरी १०८ किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेने केली.
आतापर्यंत मे महिन्यातील पावसाची सर्वाधिक नोंद ही १९ मे २००० रोजी करण्यात आली होती. या दिवशी सरासरी १९०.८ मिमी पाऊस झाला होता. मात्र हा विक्रम तौंतेच्या परिणामांमुळे मोडीत निघाला.
(after cyclone tauktae bandra worli sea link of mumbai reopens for traffic from bmc)