दिवाळीदरम्यान दिवसभरातील कुठलेही २ तास फटाके फोडता येतील, परंतु ही वेळ नक्की (सकाळ किंवा रात्र) कुठली असेल, हे ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला राहील, असं सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केलं आहे. आपल्या आधीच्या आदेशात बदल करत न्यायालयाने आता राज्य सरकारला फटाके फोडण्यासाठी वेळ ठरवण्याची मुभा दिली आहे.
२३ आॅक्टोबरला दिलेल्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीदरम्यान नागरिकांना केवळ रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडता येतील, असे आदेश दिले होते. फटाके फोडण्यासाठी दिवसातून २ तासांपेक्षा अधिक काळ वाढवून देण्यास न्यायालयाने स्पष्ट शब्दांत नकार दिला होता. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतावेळी फक्त २० मिनिटेच फटाके फोडता येतील, असं न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलं होतं. सोबतच केवळ परवानाधारक व्यक्तिलाच फटाके विकता येतील, फटाक्यांमध्ये हानीकारक रसायनांचा वापर करण्यात येऊ नये, जनतेने हरित फटाके फोडावेत, असंही न्यायालयाने म्हटलं होतं.
Supreme Court ordered the bursting of firecrackers in Tamil Nadu during Diwali for two hours. The two-hour slot has to be decided by the state government.
— ANI (@ANI) October 30, 2018
परंतु तामिळनाडू आणि पुद्दुचेरी इ. राज्यांत सकाळच्या वेळेत पारंपारिक पद्धतीने दिवाळी साजरी होत असल्याने तामिळनाडूने न्यायालयात धाव घेतली होती. तामिळनाडू सरकारने रात्री ८ ते १० या वेळेशिवाय राज्यातील जनतेसाठी पहाटे ४.३० ते ६.३० दरम्यानही फटाके फोडण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाकडे मागितली होती. त्यावर दक्षिणेकडील राज्यांना हवे असल्यास २ तासांपैकी सकाळी १ तास आणि सायंकाळी १ तास अशी वेळेची विभागणी करण्यास परवानगी न्यायालयाने दिली. सोबतच हरित फटाक्यांचा वापर करण्याचा आदेश केवळ दिल्ली-एनसीआरसाठीच असल्याचं देखील स्पष्ट केलं.
हेही वाचा-
दिवाळीत २ तासच फोडता येणार फटाके!
दिवाळीनिमित्त गिरगांवात 'किल्ले बांधणी स्पर्धे'चं आयोजन