दिवाळी म्हटलं की नवीन कपडे, फटाके, रांगोळी, गोडधोड फराळ तर आलाच. पण त्यातही बच्चे कंपनीसाठी औत्सुक्याचा आणि आवडीचा विषय म्हणजे किल्ले बनवणे. परंतु, दिवाळीच्या सुट्या आणि अंगणात चिमुकल्यांनी बनवलेले मातीचे किल्ले आता पाहायला मिळत नाही. ही संस्कृती नष्ट होऊ नये यासाठी मुंबईतल्या गिरगांवमधील गिरगांव प्रबोधन संस्थेतर्फे गेली तीन वर्षे किल्ले बांधणी स्पर्धा आयोजित केली जाते. त्याचप्रमाणे बनवलेले किल्ले प्रदर्शनासाठी ठेवलं जात असून या प्रदर्शनाला दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळतो.
यंदाच्या वर्षीही 'किल्ले बांधणी स्पर्धा' आयोजित करण्यात आली असून ही स्पर्धा १७ आणि १८ नोव्हेंबर रोजी घेण्यात येईल. या स्पर्धेसाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्यांना १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत गिरगांवमधील शारदासदन शाळा या ठिकाणी किल्ले बनवून आणायचे आहेत.
या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या विजेत्याला ५००० दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्याला ३००० आणि तिसरा क्रमांक मिळवणाऱ्या विजेत्याला २००० रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे.
'किल्ले बांधणी स्पर्धा' या स्पर्धेत पहिल्या वर्षी एकूण १० किल्ले प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. तर, मागील वर्षी एकूण २० ते २५ किल्ले प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. या स्पर्धेसाठी संपूर्ण राज्यभरातून नोंदणी येत असतात. गेल्यावर्षी मुंबईतून एकूण १५ ते १६ जणांनी यामध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे यंदाच्या वर्षी या स्पर्धेला मुंबईतून कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
'किल्ले बांधणी स्पर्धा' या स्पर्धेचं यंदा चौथं वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे असून याही वर्षी किल्ले प्रदर्शनासाठी ठेवण्यात येतील. दरवर्षी या स्पर्धेला मुंबईसह राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळतो.
- सिद्देश कारेकर, सेक्रेटरी, गिरगांव प्रबोधन संस्था
हेही वाचा -