मुंबईतील ४०४ रस्त्यांवर ३० हजार ८३२ जागा फेरीवाल्यांसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. यासाठी मुंबई महापालिकेने १५ हजार फेरीवाल्यांच्या जागांसाठी अर्ज मागवले होते. या जागांसाठी ९९ हजार अर्ज आले होते. यामध्ये ८४ हजार अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत. यापूर्वी मुंबईत १७ हजार फेरीवाले पात्र ठरले आहे. त्यानंतर आता १५ हजार फेरीवाले पात्र ठरले असून एकूण ३२ हजार फेरीवाल्यांना हक्काची जागा मिळणार आहे.
हक्काच्या जागेसाठी पालिकेकडे ९९ हजार ४३५ फेरीवाल्यांनी अर्ज केले होते. या अर्जांच्या छाननीदरम्यान पालिकेने नागरिकांकडून हरकती-सूचना मागवल्या होत्या. यानुसार १ हजार ७४५ हरकती-सूचना नोंदवल्या गेल्या. या हरकती-सूचनांनुसार पालिकेने सर्व २४ वॉर्डमध्ये १ लाख २८ हजार ४४३ फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले. यातून सद्यस्थितीत पात्र ठरलेल्या १५ हजार ३६१ फेरीवाल्यांना नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यांना लॉटरी पद्धतीने जागेचे वाटप करण्यात येणार आहे.
मुंबईत २४ विभागात १३६६ रस्त्यांवर ८५,८९१ फेरीवाल्यांसाठी जागा निश्चित करण्यात आल्या होत्या. त्यावेळी १ हजार ७४५ नागरिकांच्या हरकती सूचना प्राप्त झाल्या होत्या. नगरसेवकांसोबत झालेल्या बैठकीत नगरसेवकांनी केलेल्या हरकती आणि सूचना यावरही चर्चा करत योग्य ते बदल करण्यात आले होते. नागरिकांच्या, नगरसेवकांच्या हरकती आणि सूचना लक्षात घेत नगरपथ विक्रेता समितीला मान्यता देत मुंबईत एकूण ४०४ रस्त्यांवर ३० हजार ८३२ फेरीवाला जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा -
मुंबईच्या या भागातील रुग्णसंख्येत घट; स्थानिकांना दिलासा
कोरोनामुळं आर्थिक स्थिती बिकट; १४ वर्षांच्या मुलावर चहा विकण्याची वेळ