राज्याच्या विविध भागात पडणारा अवकाळी पाऊस आणि मुंबईत वाढलेले तापमान आणि हवेतील आर्द्रतेचे प्रमाण यामुळे मुंबईकरांना सोमवारसह मंगळवारी देखील चांगलाच घाम गाळावा लागणार आहे.
[हे पण वाचा - उकाड्यामुळे पशु-पक्षीही हैराण]
राज्याच्या अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसासह गारपीट होत आहे. मुंबईतील आसपासच्या भागातही अनेक ठिकाणी पाऊस पडल्यामुळे ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यातच मुंबईत तापमानही वाढल्यामुळे हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी या दोन दिवसात मुंबईकरांना जास्तच घाम गाळावा लागणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
[हे पण वाचा - हवामानातील बदलामुळे मुंबईत ढगाळ वातावरणाची शक्यता]
मुंबईत गेल्या 24 तासात कुलाब्यात 34.4 अंश कमाल तापमानाची, तर 28.4 अंश किमान तापमानाची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे सांताक्रूझ येथे 33.7 अंश कमाल तर 27.0 अंश किमान तापमानाची नोंद झाली आहे. पुढील 48 तासात तापमान स्थिर राहणार असून वातावरण ढगाळलेले असणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना हे दोन दिवस जास्तच घाम गाळावा लागणार आहे.