Advertisement

कचरा विल्हेवाटीसाठी भाजपा नगरसेवकांचा पुढाकार


कचरा विल्हेवाटीसाठी भाजपा नगरसेवकांचा पुढाकार
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छता अभियान हाती घेतल्यानंतर मुंबईतील भाजपाच्या नगरसेवकांनी कचरा विल्हेवाटीसासाठी पुढाकार घेतला आहे. मुंबईत कचऱ्याची विल्हेवाट सोसायटीच्या आवारात तसेच संकलन केंद्रांमध्ये झाल्यास डंपिंग ग्राऊंडमध्ये हा कचराच जाणार  नाही. त्यामुळे भाजपच्या तीन सदस्यांनी वेगवेगळया स्वरूपात कचरा विल्हेवाटीसाठी मांडलेल्या ठरावाच्या सूचना महापालिका सभागृहात मंजूर करण्यात आल्या आहेत.


ओल्या कचऱ्यासाठी खड्डे खोदा

भाजपच्या विलेपार्ले येथील नगरसेविका ज्योती आळवणी यांनी नवीन इमारतींच्या बांधकामांची परवानगी देताना त्या इमारतींमध्ये तयार होणाऱ्या ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी इमारतींच्या आवारातच विकासकाने ओल्या कचऱ्याकरता खड्डे तयार करणे बंधनकारक करण्यात यावे, अशी अट आराखडा ना पसंतीच्या सूचनेमध्ये (आयओडी) अंतर्भूत करण्यात यावी, अशी मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे. येत्या २ ऑक्टोबरपासून २० हजार चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या जागेमधील संकुलात कचरा उचलण्यात येणार नाही, असा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.


खतनिर्मिती पेट्या पुरवा

मुंबईतील गृहनिर्माण संस्था, शाळा, महाविद्यालये उपहारगृहे आणि मंड्या इत्यादी ठिकाणी जमा होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून त्यांच्या आवारात खतनिर्मिती प्रकल्प राबवण्याकरता खतनिर्मिती पेट्या महापालिकेच्या वतीने पुरवण्यात याव्यात, अशी मागणी भाजपाच्या नगरसेविका नेहल शाह यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे. तयार होणाऱ्या खताचा वापर त्याच संकुलातील, त्याच आवारातील अथवा परिसरातील उद्यानांत करण्यात यावा, जेणेकरून डंपिंग ग्राऊंडवर कचरा वाहूून नेण्यावर होणारा खर्च वाचेल आणि शून्य कचरा ही संकल्पनाही प्रभावीपणे राबवता येईल.


समुद्र  किनाऱ्यांवरच निर्माल्याचे विघटन करा

तर भाजपाच्या अन्य नगरसेविका स्वप्ना म्हात्रे यांनी मुंबईतील सर्व समुद्र किनाऱ्यांवर निर्माल्याचे विघटन होऊन सेंद्रीय खत तयार करण्यासाठी योग्य ती शास्त्र आधारीत व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. महापालिका प्रशासन फक्त गणेशाेत्सव व नवरात्रोत्सव या सणांवेळीच निर्माल्य अर्पण करण्यासाठी मुंबईतील समुद्र तटांवर निर्माल्य कलश उपलब्ध करुन देते, इतर वेळी निर्माल्य कलशाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे निर्माल्य समुद्रातच टाकले जाते. समुद्राच्या लाटेबरोबरच वाहून आलेल्या निर्माल्यामुळे किनारे अस्वच्छ होतात, असे त्यांनी या ठरावाच्या सूचनेत म्हटले आहे.


ठराव मांडण्यापूर्वीच मंजूर

या तिन्ही ठरावांच्या सूचना महापालिका सभागृहात एकमुखाने मंजूर करण्यात आल्या. मात्र, या ठरावाच्या सूचना स्वप्ना म्हात्रे तसेच ज्योती अळवणी यांनी मांडण्यापूर्वीच महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी या सूचना मंजूर करत त्यांना या विषयावर बोलण्याची संधी नाकारली. या दोन्ही सदस्या ठराव मांडण्यासाठी उभ्या राहिल्या. परंतु ते आपले विषय मांडण्यापूर्वीच महापौरांनी अनुकूल, प्रतिकूल म्हणून त्याला मंजुरी दिली.



हेही वाचा

कचराऱ्याची विल्हेवाट लावा, नाहीतर गुन्हा दाखल होईल!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा