मुंबईतील रस्त्यांवर पडलेले खड्डे ४८ तासांमध्ये बुजवले जातील, असा दावा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी केल्यानंतर पावसानेही त्यांच्यावर कृपादृष्टी दाखवली आहे. त्यामुळे खड्डे बुजवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून केवळ ३०० खड्डेच शिल्लक असल्याचा दावा महापालिका प्रशासनानं केला आहे. हे सर्व शिल्लक खड्डे रविवारपर्यंत बुजवले जातील, असाही विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुंबईत गेल्या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसाने रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या पुन्हा एकदा उद्भवली आहे. अनेक भागांमध्ये खड्डे निर्माण झालेले आहेत. बहुतांशी भागांमध्ये नव्याने तयार केलेल्या रस्त्यांवरही खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे खड्ड्यांवरून विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी महापालिका सभागृहात निवेदन करून वातावरण तापवल्यानंतर सर्वच नगरसेवकांनी विभागातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची कुंडली वाचून दाखवली. त्यामुळे हे सर्व खड्डे ४८ तासांमध्ये बुजवले जातील, असं आश्वासन अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी दिलं होतं.
प्रशासनानं ४८ तासांचं अल्टिमेटम दिलं होतं, तेव्हा खड्ड्यांच्या एकूण १००० तक्रारी ऑनलाईनद्वारे प्राप्त झाल्या होत्या. त्यातील सर्व खड्डे विभागामार्फत बुजवण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली असून शुक्रवार रात्रीपर्यंत त्यातील केवळ ३० टक्के अर्थात ३०० खड्डे बुजवले गेले होते. त्यातील काही खड्डे शनिवारी बुजवण्यात आले आहेत. उर्वरित खड्डे रविवारपर्यंत बुजवले जातील, अशी माहिती रस्ते प्रमुख अभियंता व अभियांत्रिकी संचालक विनोद चिठोरे यांनी दिली आहे.
हेही वाचा -
हवामानाचा अचूक अंदाज मिळणार, मुंबईत येणार नवं डाॅपलर रडार!