Advertisement

पावसात पाणी तुंबणारच- महापालिका प्रशासन निरुत्तर


पावसात पाणी तुंबणारच- महापालिका प्रशासन निरुत्तर
SHARES

मुंबईमध्ये सुमारे 500 कोटी रुपये खर्च करून पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेने पम्पिंग स्टेशनची उभारणी केली; तरीही शहरात ठिकठिकाणी पाणी तुंबतच आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च कशासाठी केले? असा सवाल करत ब्रिटानिया पम्पिंग स्टेशनमुळे हिंदमातासह आसपासच्या परिसरात पाणी तुंबणार नाही, याची ग्वाही महापालिका प्रशासनाने द्यावी, अशी मागणी भाजपाच्या सदस्यांसह विरोधी पक्षांनी केली. परंतु या पम्पिंग स्टेशनमुळे पाणी तुंबणार की नाही? याबाबत खुद्द प्रशासनच साशंक असल्यामुळे त्यांना समिती सदस्यांच्या प्रश्नांचे उत्तरच देता आली नाही.


दोन वर्षांनी कंपनीवर दंड आकारण्याचा प्रस्ताव

वरळीतील लव्हग्रोव्ह व क्लिव्हलँड बंदर येथील पम्पिंग स्टेशनच्या बांधकामाला विलंब केल्याप्रकरणी अनुक्रमे 5.45 कोटी व 3.89 कोटी रुपयांचा दंड आकारण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सादर केला.


100 कोटी खर्च करून उपयोग काय?

या प्रस्तावावर बोलताना भाजपाचे मनोज कोटक यांनी 2016 मध्ये ब्रिटानिया पम्पिंग स्टेशनची उभारणी केल्यानंतर प्रशासनासह सर्वांनी हिंदमातासह आसपासच्या परिसरात पाणी तुंबणार नाही, असे जाहीर केले होते. तरीही मागील वर्षी तीन वेळा पाणी तुंबले तसेच या पावसाळ्यातही तुंबले. एवढेच नाही तर परिसरात 55 पंप बसवण्यता आले. मग 100 कोटी खर्च करूनही पाणी तुंबणार असेल तर पैसे खर्च करण्याचा उपयोग काय? प्रशासनाने यापुढे या परिसरात पाणी तुंबणार नाही याची लेखी ग्वाही द्यावी, अशी मागणी केली. तसेच संबंधित कंत्राटदारांचे काम पूर्ण होऊन होऊन दोन वर्षे उलटत आल्यावर ही दंडात्मक कारवाई का केली जाते. या विलंबाने होणाऱ्या कारवाईला जबाबदार कोण? असा सवालही केला.


पम्पिंग स्टेशन उभारण्याच्या कामाची चौकशी व्हावी

विरोधी पक्षनेते रवी राजा यांनीही पम्पिंग स्टेशन उभारुनही पाणी तुंबत असेल तर त्याची चौकशी केली जावी, असे सांगत दंडात्मक कारवाई करण्यात येणाऱ्या कंत्राटदारांना यापुढे काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी केली. मात्र, सभागृहनेते यशवंत जाधव यांनी प्रशासनाची पाठराखण करत पाणी तुंबण्याचे प्रमाण कमी झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. यापुढे पाणी तुंबणार नाही, यावर प्रशासनाने आता लक्ष ठेवून राहावे असे सांगत काही अडचणी असल्यास दूर कराव्यात अशा सूचना केल्या.



हे वाचा - हिंदमाता यंदाही तुंबणार!

हे देखील वाचा -  मुसळधार पावसामुळे दादर, परळमध्ये पाणी तुंबले



महापालिका म्हणते, अभिप्राय जाणून घेण्यासाठी विलंब

विधी खात्याचे अभिप्राय जाणून घेण्यासाठी विलंब झाला. त्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यास विलंब झाल्याचे सांगत अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी हिंदमाता परिसरासह अन्य भागात भविष्यात पाणी तुंबणार की नाही याबाबत सांगण्यास नकार दिला.


माहुलच्या पम्पिंगनंतरच शीवमधील पाणी तुंबणे थांबणार

शीव, अॅन्टॉप हिल, प्रतीक्षा नगरसह आसपासच्या परिसरात अवघे काही मिनिटे पाऊस पडला तरी रस्ते पाण्याखाली जातात. त्यामुळे तुंबलेल्या पाण्यामुळे येथील नागरिक हैराण असून यावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. परंतु या भागात साचणाऱ्या पाण्याचा निचरा हा माहुल पम्पिंग स्टेशनच्या उभारणीनंतरच होऊ शकतो, असे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी निदर्शनास आणून दिले. यावर भाजपाच्या नगरसेविका राजेश्री शिरवाडकर यांनीही आपल्याला अशीच उत्तरे दिली जात असल्याचे सांगत जर हे प्रशासन अभिनंदनास नव्हे तर टिकेस पात्र असल्याचे सांगितले.


पंप कशासाठी?

पम्पिंग स्टेशनच्या उभारणीनंतरही पंपाची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. यामागे पाण्याचा निचरा करणे हाच उद्देश आहे. पाऊस पडल्यानंतरही अनेक सखल भागांमध्ये पाणी साचून राहते. या पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप बसवण्यात आले असून पम्पिंग स्टेशनच्या माध्यमातून पावसात तुंबलेल्या पाण्याचा निचरा केला जातो, असे सांगण्याचा प्रयत्न सत्ताधारी शिवसेनेचे मंगेश सातमकर यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. यावर विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी प्रशासनाची पाठराखण नको तर त्यांना जाब विचारा, अशा शब्दांत प्रशासनाचा समाचार घेतला. तर आशिष चेंबुरकर यांनी लोकांनीच काही नाल्यात फेकू नये, म्हणजे पाणी तुंबणार नसल्याचे सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत रईस शेख, अभिजित सामंत आदींनी भाग घेतला.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा