Advertisement

Cyclone nisarga: महापालिकेच्या ३५ शाळांमध्ये राहण्याची सोय

निसर्ग चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन मुंबईच्या समुद्र किनाऱ्यानजीक राहणाऱ्या रहिवाशांच्या निवासाची सोय महापालिका प्रशासनाने केली आहे.

Cyclone nisarga: महापालिकेच्या ३५ शाळांमध्ये राहण्याची सोय
SHARES

निसर्ग चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन मुंबईच्या समुद्र किनाऱ्यानजीक राहणाऱ्या रहिवाशांच्या निवासाची सोय महापालिका प्रशासनाने केली आहे. मुंबई महापालिकेतर्फे सुमारे ३५ शाळांमध्ये (bmc arranges 35 schools as temporary shelters for mumbaikars ahead of cyclone nisarga) नागरिकांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. आवश्यकता लागल्यास नागरिकांना स्थलांतरित होण्याचं आवाहन देखील महापालिकेकडून करण्यात आलं आहे. 

रायगड, अलिबाग परिसरात ‘निसर्ग चक्रीवादळा’ने धडक दिली आहे. या वादळाने दुपारी दोनच्या सुमारास समुद्रातून जमिनीवर प्रवेश केला असून या चक्रीवादळाचा परिघ ५० ते ६० किमीपर्यंत असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबई समुद्र किनाऱ्यावरही जोरदार वारे वाहू लागले आहे. समुद्रही खवळला आहे. अलिबागहून पुढं सरकत असलेल्या चक्रीवादळाची तीव्रता देखील वाढत आहे. मुंबई, ठाणे किनारपट्टी भागात पोहोचल्यावर प्रतितास १०० ते १२० किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहतील, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्याचा परिणामही जाणवायला लागला असून कुलाबा , कफ परेड, नरिमन पाॅईंट, वरळी, माहीम इत्यादी परिसरातील झाडे जोरदार वाऱ्यामुळे उन्मळून पडत आहेत. 

हेही वाचा- निसर्ग चक्रीवादळाची मुंबई, ठाण्याच्या दिशेने कूच- आयएमडी

आपातकालीन परिस्थिती उदभवल्यास त्याचा सामना करण्यासाठी मुंबईत अग्निशमन दलाला अलर्ट राहण्याचे निर्देश देण्यात आले असून मुंबईतील ६ समुद्र किनाऱ्यांवर ९३ जीवरक्षकांना तैनात करण्यात आले आहेत. तर मुंबईतील वेगवेगळया भागांमध्ये एनडीआरएफच्या ८ आणि नौदलाच्या ५ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. कुलाबा (Ward A), वरळी (G/South), वांद्रे (H/East), मालाड (P/South), बोरीवली (R/North) या भागात प्रत्येकी १ आणि अंधेरीत (K/West) ३ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

तर, मुंबई महापालिकेतर्फे सुमारे ३५ शाळांमध्ये नागरिकांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. आवश्यकता लागल्यास नागरिकांना स्थलांतरित होण्याचं आवाहन मुंबई पोलीस आणि महापालिकेकडून करण्यात येत आहे. माहीम पथ्थरवाडी येथील २५० लोकांना काॅज वे येथील महापालिका शाळेत हलवण्यात आलं आहे. आपत्कालीन स्थितीत मुंबईकर नागरिक हेल्पलाईन क्रमांक १९१६ डायल करून त्यानंतर ४ दाबून आवश्यक ती मदत मागू शकतात, असं सांगण्यात आलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा