मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने यंदा मुंबईला पाणी कपातीला सामोरं जावं लागणार, अशी शक्यता गेल्या काही दिवसांपासून व्यक्त होत होती. ही शक्यता अखेर खरी ठरली आहे. गुरूवार, १५ नोव्हेंबरपासून पावसाळा सुरू होईपर्यंत मुंबईकरांना १० टक्के पाणी कपातीला सामोरे जावं लागणार आहे.
महापालिका प्रशासनाने १५ नोव्हेंबरपासून निवासी-व्यावसायिक आणि इतर जलजोडणीधारकांच्या पाणीपुरवठ्याच्या वेळेत १५ टक्के कपात केली आहे. तर मुंबईच्या पाणीपुरवठ्यात सरसकट १० टक्के पाणीकपात केली आहे. यासंबंधीचा प्रस्ताव बुधवारी महापालिकेच्या स्थायी समितीच्या परवानगीशिवाय मंजूर करण्यात आला आहे.
महत्त्वाचं म्हणजे मुंबई महापालिकेकडून पाणी पुरवठा हाेणाऱ्या भिवंडी, ठाणे, कल्याणमधील परिसरांत देखील १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनो, आता पाणी जरा जपून वापरा.
मुंबईला सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी दरवर्षी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. असं असताना सध्या मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ११ लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ९२ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. तिथं यंदा नोव्हेंबरदरम्यान केवळ ७६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिकेनं पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव बुधवारी महापालिकेच्या स्थायी समितीत मांडला आणि स्थायी समितीची मंजुरी न घेताच महापालिका प्रशासनाने हा प्रस्ताव मंजूर केला. पावसाळा सुरू होण्यासाठी ६ महिन्यांहून अधिक काळ बाकी आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये सुरू झालेलं पाणी कपातीचं संकट येत्या काळात आणखी गहिरं होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा-
मुंबईत 10 टक्के पाणी कपातीची शक्यता
मुंबईत अघोषित पाणी कपात! महापालिकेच्या स्थायी समितीत विरोधकांचा राडा