पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी अलीकडे सिंगल-युज प्लास्टिकच्या विरोधात आपली मोहीम पुन्हा सुरू केली. दहा दिवसांत बृहन्मुंबई महानगरपालिकेनं २.२ हजार किलो प्लास्टिक जप्त केलं आहे. तसंच २ लाख दंड वसूल केला. आदित्य ठाकरे यांनी जाहीर केलं होतं की, महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं १ मे २०२० पर्यंत शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा अधिकारी विचार करत आहेत.
१ मार्च ते ९ मार्च या कालावधीत पालिकेनं ही कारवाई केली. पालिकेनं दिलेल्या माहितीनुसार, प्लास्टिक वापरणाऱ्यांना पकडण्यासाठी २९ हजार २१६ ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. अधिकाऱ्यांनी एकूण २, २५३.४३५ किलोग्राम प्लास्टिक जप्त केलं. यातून जवळपास २९, २०, ००० रुपये दंड वसूल केला. सिंगल-युज प्लास्टिक वापरणाऱ्या दुकानदारांना ५ हजार दंड आकारण्यात आला.
राज्य सरकारनं यापूर्वी २०१८ मध्ये प्लास्टिक बंदी घातली होती. पण पालिकेच्या या निर्णयाला फेरीवाल्यांनी आणि मुंबईकरांनी केराची टोपली दाखवली. काही कालावधीनंतर मुंबईकरांनी प्लास्टिक पुन्हा वापरण्यास सुरवात केलं. आदित्य ठाकरे म्हणाले होते की, ज्यांच्याकडे सिंगल युज प्लास्टिक आढळेल त्यांना ५ हजार रुपये दंड आणि पुन्हा पकडल्यास २५ हजार रुपये दंड आकारला जाईल.
गेल्या काही आठवड्यात प्लास्टिकचा वापर कमी करण्याच्या दृष्टीनं पालिकेनं पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला. आता इतर क्षेत्रांमध्ये देखील पर्यावरणास अनुकूल अशा पद्धती अवलंबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसंच मच्छिमारांना पर्यावरणपूरक प्लास्टिक कंटेनर देण्याचा प्रस्ताव आहे. प्लास्टिकच्या कंटेनर प्रमाणेच हे पर्यावरणास अनुकूल असे कंटेनर जास्त काळ टिकतात आणि २० किलोग्रामपर्यंत मासे ठेवू शकतात.
किनारपट्टीच्या रस्ते प्रकल्पाच्या बांधकामात पर्यावरणपूरक काँक्रीटचा वापर केला जात आहे. हे पर्यावरणास अनुकूल कॉंक्रिट असं मिश्रण आहे जे कमी सिमेंट वापरतं आणि अशा प्रकारे वनस्पती आणि जीवजंतूसाठी कमी हानिकारक आहे.
हेही वाचा