मुंबईतील वाहतुककोंडीला शिस्त लावण्यासाठी महापालिकेनं 'नो पार्किंग'चा निर्णय घेतला असून, नो पार्किंग झोनमध्ये पार्क करणाऱ्या गाड्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्याशिवाय, महापालिकेनं मुंबईत सार्वजनिक वाहनतळं उपलब्ध करून दिली आहेत. मात्र, या ६१ ठिकाणांवरील वाहनतळांचा वापर न करता अजूनही अवजड वाहनांचे चालक आपल्या गाड्या अनधिकृतपणे रस्त्यांवर पार्क करत आहेत. अशा ५२ बस व १३ ट्रकवर महापालिकेनं दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईअंतर्गत तब्बल ९ लाख रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. यापैकी १ लाख ८० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
अवजड वाहनांच्या अनधिकृत पार्किंगसाठी १० हजार दंड, तर टोचन शुल्क म्हणून ५ हजार याप्रमाणं एकूण रुपये १५ हजार एवढ्या रकमेची आकारणी करण्यात येत आहे. ज्या दिवशी टोचन करण्यात येईल, त्याच दिवशी गाडी सोडवून नेली नाही, तर प्रतिदिन २७५ रुपये विलंब आकार वसूल केला जात आहे. ही दंड आकारणी कमाल ३० दिवसांपर्यंत होणार आहे. यानुसार एका अवजड वाहनावर रुपये २३ हजार २५० एवढा कमाल दंड आकारला जात आहे.
१९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी उशिरापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईवेळी ५२ बस व १३ ट्रकवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये जी दक्षिण विभागात सर्वाधिक म्हणजे ११ अवजड वाहनांवर त्यानंतर के पूर्व विभागात १० वाहनांवर आणि एन विभागात ७ वाहनांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे
हेही वाचा -
सेन्सेक्सची १० वर्षातील सर्वात मोठी उसळी, पहा किती वाढला सेन्सेक्स