Advertisement

निष्काळजीपणा! ३ वर्षात ३ हजार सोसायट्यांना अग्निशमन दलाच्या नोटीसा

मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांकडून आगप्रतिबंधक कायदा धाब्यावर बसवला जात असून कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या अशा ३ हजार २६ सोसायट्यांना अग्शिमन दलाकडून नोटीसा बजावण्यात आल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.

निष्काळजीपणा! ३ वर्षात ३ हजार सोसायट्यांना अग्निशमन दलाच्या नोटीसा
SHARES

कमला मिल आगीच्या दुर्घटनेनंतर देखील मुंबईत आग लागण्याचा सिलसिला कायम आहे. गेल्या १० वर्षात मुंबईत ४८ हजार ४४३ आगीच्या घटना घडल्या असतानाही मुंबईकर आगीच्या बाबतीच्या निष्काळजीपणाच दाखवत असल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांकडून आगप्रतिबंधक कायदा धाब्यावर बसवला जात असून कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या अशा ३ हजार २६ सोसायट्यांना अग्शिमन दलाकडून नोटीसा बजावण्यात आल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.

महाराष्ट्र अग्निशमन प्रतिबंध आणि जीवन सुरक्षा उपाय कायदा २००६ नुसार प्रत्येक निवासी-व्यावसायिक इमारतीत अग्निरोधक यंत्रणा बसवणं बंधनकारक आहे. अशी यंत्रणा असल्याशिवाय इमारतींना अग्निशमन दलाकडून ना हरकत प्रमाणपत्रच मिळत नाही. अग्निरोधक यंत्रणा बसवल्यानंतर त्या यंत्रणेच्या देखभाल-दुरूस्तीचीही जबाबदारी सोसायटीवर असते.


यंत्रणा बिनकामाची

इतकंच नव्हे, तर दर ६ महिन्यांनी फायर सेफ्टी आॅडिट करणंही बंधनकारक आहे. प्रत्यक्षात सोसायट्या फायर सेफ्टी आॅडिट, अग्निरोधक यंत्रणेची देखभाल-दुरूस्ती करत नाहीत. त्यामुळे मुंबईतील ९० टक्के सोसायटी-इमारतींमधील अग्निरोधक यंत्रणा बिनकामाची ठरत असल्याची कबुली काही महिन्यांपूर्वीच रहांगदळे यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना दिली होती.


सोसायट्या उदासीन

अग्निशमन प्रतिबंध कायद्याचं उल्लंघन सोसायट्यांकडून होत असल्यानेच गेल्या काही वर्षांत आगीच्या घटना वाढल्या आहेत. आग छोटी असतानाही अग्निरोधक यंत्रणाच काम करत नसल्यानं आगीवर नियंत्रण मिळवण अवघड होत असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळेच काही महिन्यांपूर्वीच अग्निरोधक प्रतिबंध कायदा २००६ मध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या सोसायट्यांचं वीज-पाणी कापण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र कायदा कडक केल्यानंतरही सोसायट्या उदासीन असल्याचंच चित्र आहे.


कायद्याचं उल्लंघन

रहांगदळे यांनी दिलेल्या माहितीनुसार २०१५ ते २०१८ या तीन३ वर्षांच्या काळात अग्निशमन दलाने तब्बल ६१४२ इमारतींची तपासणी केली आहे. या तपासणीत तब्बल ३ हजार २६ इमारतींमध्ये अग्निप्रतिबंध कायद्याचं उल्लंघन झाल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यानुसार या ३ हजार २६ सोसायट्यांना नोटीसा पाठवत त्यांच्याविरोधात आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचंही रहांगदळे यांनी सांगितलं आहे. महत्त्वाचं म्हणजे यातील ३६ इमारतींविरोधात कडक कारवाई करत त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आल्याचंही अग्निशमन दलाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.



हेही वाचा-

आरेतील आग जाणीवपूर्वक लावलेली, दिंडोशी वनधिकाऱ्यांचा खळबळजनक दावा

आरे काॅलनीतील आग ६ तासांनंतर नियंत्रणात, संशयाचा धूर मात्र कायम



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा