Advertisement

मुंबई महापालिका कामगार भरतीची परीक्षा पुन्हा होणार?

प्रश्नांची काठिण्य पातळी ही सफाई कर्मचाऱ्यांच्या मानाने खूपच कठीण असल्याचं मत सर्व विभागातून नोंदवलं गेलं. सफाई कामगार भरतीमध्ये दहावी पास असलेल्या उमेदवारांना जे प्रश्न विचारले आहेत, त्याची उत्तरं पदवीधर विद्यार्थ्यांनाही येतील की नाही ही शंका असल्याच्या प्रतिक्रिया सर्व स्तरांतून उमटल्या.

मुंबई महापालिका कामगार भरतीची परीक्षा पुन्हा होणार?
SHARES

मुंबई महापालिकेच्या १३८८ चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरतीसाठीच्या परीक्षेवरून वाद सुरू झाला आहे. ही परीक्षाच रद्द करण्याची मागणी भाजपाचे आमदार भाई गिरकर यांनी विधानपरिषदेत केली आहे. या परीक्षेतील सफाई कर्मचाऱ्यांसाठीच्या पेपरमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे पडसाद विधानभवनात पहायला मिळाले. तसंच ऑनलाईन परीक्षा घेतल्यानं अनेकांना त्याचा मोठा फटका बसल्याचंही गिरकर यांनी म्हटलं आहे.



प्रश्नांच्या काठिण्य पातळीवरून वाद

सफाई कामगारांच्या भरती प्रक्रियेसाठी पालिकेतर्फे नुकतीच ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. मात्र त्यातील प्रश्नांची काठिण्य पातळी ही सफाई कर्मचाऱ्यांच्या मानाने खूपच कठीण असल्याचं मत सर्व विभागातून नोंदवलं गेलं.



सफाई कामगार भरतीमध्ये दहावी पास असलेल्या उमेदवारांना जे प्रश्न विचारले आहेत, त्याची उत्तरं पदवीधर विद्यार्थ्यांनाही येतील की नाही ही शंका असल्याच्या प्रतिक्रिया सर्व स्तरांतून उमटल्या. याप्रकरणी गिरकर यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर या प्रकरणी चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश सभापती रामराजे निंबाळकर यांनी दिले आहेत.



'वेटिंग लिस्टच्या उमेदवारांना संधी द्यायला हवी'

सफाई कामगारांसाठी याआधी 2009 मध्ये भरती घेतली गेली होती. त्यावेळी त्यांची फिटनेस टेस्ट आणि लेखी परीक्षा घेतली होती. त्यातील अनेकजण हे वेटिंग लिस्टवर होते, अशी माहिती भाई गिरकर यांनी दिली. खेड्यापाड्यातून आलेल्या माणसाला थेट कॉम्प्युटरवर बसवून परीक्षा द्यायला लावणे यावर त्यांनी आक्षेप घेतलाच, शिवाय एका अर्जाची किंमत 800 रुपये आहे. एकूण 2 लाख सफाई कर्मचाऱ्यांनी परीक्षा दिल्याचं समोर येत आहे. त्याऐवजी आधीच्या उमेदवारांना प्राधान्य द्यायला हवं होतं, असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे आता महापालिका त्यावर काय निर्णय घेते, हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.



याप्रकरणी मी मुख्यमंत्री आणि मुंबईच्या महापौरांना परीक्षा रद्द करुन पुन्हा घेण्याबाबत निवेदन देणार आहे. शासनाने यासंदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा हीच अपेक्षा आहे.

भाई गिरकर, सदस्य विधानपरिषद



हेही वाचा

मुंबई महापालिका चतुर्थ श्रेणी कामगार भरतीची प्रतीक्षा यादी काढणार नाही!


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा