मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसात ४ सप्टेंबर रोजी गोरेगावमधील सिद्धार्थ नगर नाल्यातील तुंबलेल्या पाण्याचा निचरा करताना जगदीश परमार (५४) आणि विजेंद्र बागडी (४०) या मुंबई महापालिकेच्या २ कर्मचाऱ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एका वारसाला महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिले आहेत. सोबतच या कामगारांची देणी लवकरात लवकर देण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
गेल्या आठवड्यापासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाच्या पाण्यामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबत असल्याने या पाण्याचा निचरा करण्यासाठी तसंच इतर सोयी-सुविधांसाठी महापालिकेचे ३२ हजारांहून अधिक कर्मचारी कर्तव्यावर होते. त्यानुसार ४ सप्टेंबर रोजी परमार आणि बागडी हे देखील सिद्धार्थ नगर नाल्यातील तुंबलेल्या पाण्याचा निचरा करत असताना पाण्यात तोल जाऊन पडले. यांतच त्यांचा बुडून मृत्यू झाला. यानंतर दोघांच्या कुटुंबातील वारसांना नोकरी देण्याची मागणी मोतीलाल विकास समितीने उचलून धरली होती.
हेही वाचा-
मुसळधार पावसाने घेतला महापालिका कर्मचाऱ्यांसह चौघांचा बळी
मुंबई- पुणे महामार्गावर ट्रॉमा केअर सेंटर, योग्य वेळेत होणार उपचार