मुंबईसह राज्यात गेल्या वर्षी गुढीपाडव्यापासून प्लास्टिक बंदी लागू झाली आहे. त्यानुसार मुंबईत मुंबई महानगरपालिकेकडून प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी सुरू असून पालिकेनं नुकतीच या कारवाईची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार गेल्या सात महिन्यात ४८ हजार ८४१ किलो प्लास्टिक पालिकेनं जप्त केलं आहे. त्याशिवाय प्लास्टिक बंदीच्या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांनाही दणका देत त्यांच्याकडून २ कोटी २१ लाखांचा दंड वसूल केला आहे.
प्लास्टिक बंदीची कडक अंमलबाजवणी करण्याच्या दृष्टीनं पालिकेच्या पथकांची मुंबईतील बाजारांवर आणि दुकानांवर करडी नजर ठेवली जात आहे. तर प्लास्टिक आढळल्यानंतर त्वरीत प्लास्टिक जप्त करत दंड आकारला जात आहे. दरम्यान पालिकेनं २३ जून २०१८ पासून प्लास्टिक बंदीची धडक मोहिम राबवण्यास सुरूवात केली आहे. त्या अनुषंगानं गेल्या सात महिन्यात पालिकेनं ३७७ फेरीवाल्यांना कायद्याचा धाक दाखवला आहे. त्यांच्याकडून प्लास्टिक जप्त करत त्यांना दंड ठोठावला आहे. तर दंड देण्यास नकार देणाऱ्यांविरोधात पालिकेकडून खटले दाखल करण्यात आल्याची माहिती पालिकेनं दिली आहे.
प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी पालिकेनं सफाई कर्मचाऱ्यांचीही मदत घेतली आहे. त्यानुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून विक्रेते आणि फेरीवाल्यांमध्ये जनजागृती निर्माण करत मुंबई प्लास्टिकमुक्त करण्यासाठी विशेष मोहिम राबवली जात आहे. त्यानुसार आजच्या घडीला पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांची २४ पथकं मुंबईत कार्यरत आहेत. ही पथकं जनजागृती करण्यासह दिवसाला १०० किलो प्लास्टिक जमा करण्याचं काम करत असल्याचंही पालिकेनं स्पष्ट केलं आहे. प्लास्टिक बॅग, चमचे, प्लेट, बाॅटल आणि थर्माकोल इत्यादींचा समावेश यात असतो.
हेही वाचा