परदेशातील नद्या इतक्या स्वच्छ असतात की त्यांचं सौंदर्य कुणालाही भुरळ घालेल. त्यातुलनेत मुंबईतील म्हणजे गटारगंगा झाल्या आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेने प्रदूषित मिठी नदी आणि पवई तलावाच्या स्वच्छतेसाठी पाश्चात्य तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरीता लवकरच कॅनेडियन कंपनीसोबत एक करार करण्यात येणार आहे.
कॅनडाहून आलेल्या दासून इंटरनॅशनल आणि इकोनिक एकता वेंचर्स प्रा. लि. या कंपन्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी महापालिकेत अत्याधुनिक स्वच्छता उपक्रमाचं सादरीकरण केलं. मिठी नदी तसंच पवई तलावाच्या स्वच्छतेसाठी महापालिका कॅनडातील डीसीएल १७ हे तंत्रज्ञान वापरणार आहे. हे तंत्रज्ञान वापरून नदीची स्वच्छता करताना जैवविविधतेला बाधा येत नाही.
या तंत्रज्ञानाचा वापर करुन जगभरातील अनेक नद्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. जगभरातील पाण्याचा प्रश्नही डीसीएल १७ मुळे सोडविण्यास मदत झाल्याचा या कंपन्यांचा दावा आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरातून पाण्यातील हानीकारक रोगजन्य जिवाणूंचा नाश करता येतो. तसंच या टेक्नॉलॉजीनुसार ५ ग्रॅममध्ये १० लिटर पाणी शुद्धीकरण करता येतं. आतापर्यंत ढाका येथील तलाव, बँकॉक, थायलंड, ग्रेटर टोरंटो, कॅनडा, मिसिसिपी नदी आदी ठिकाणी प्रयोग करण्यात आले असून ते यशस्वी झाल्याचं महापालिकेने म्हटलं आहे.
हेही वाचा-
मुंबईतील विहिरींचं पाणीही वापरता येणार, स्वच्छतेसाठी १० लाखांचा निधी