मुंबईतील देवनार आणि मुलुंड कचराभूमी अर्थात डम्पिंग ग्राउंडची मर्यादित क्षमता संपल्याने कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता हा प्रश्न सुटला आहे. कारण अंबरनाथ येथील करवले गावात ३० एकर जागेचा ताबा मुंबई पालिकेला येत्या तीन महिन्यांत मिळणार आहे.
शुक्रवारी मुलुंड व देवनार डम्पिंग ग्राऊंडप्रकरणाची सुनावणी उच्च न्यायालयात झाली. यावेळी येत्या तीन महिन्यांत अंबरनाथ येथील करवले गावातील ३० एकर जागेचा ताबा मुंबई पालिकेला देणार, असं आश्वासन राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिलं.
मुंबईतील देवनार आणि मुलुंड डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपल्याने पर्यायी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे मुंबई पालिकेने या डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी उच्च न्यायालयाकडून वारंवार मुदत मागितली होती. यासंदर्भात शुक्रवारी झालेल्या सुनावणीवेळी राज्य सरकारचे वकील राम आपटे यांनी अंबरनाथ येथील करवले गावातील तीस एकर जागेचा ताबा, पुढच्या वर्षी ३१ जानेवारीपर्यंत पालिकेला देण्याचं आश्वासन उच्च न्यायालयाला दिले.
त्यानुसार तीन महिन्यांत करवलेतील ३० एकर जागेचा ताबा पालिकेला द्या असे आदेश न्यायालयाने दिला. याशिवाय मुलुंड येथील मिठागरची जागा हस्तांतरित करण्याची प्रक्रिया कुठपर्यंत आली, याची माहितीही १५ डिसेंबरला प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने यावेळी दिले.