मुंबईत दर पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार घडत असल्याने या पाण्याचा निचरा करण्यासाठी मॅनहोल्सची झाकणे उघडली जातात. साचलेल्या पाण्यात उघडलेल्या मॅनहोलचा अंदाज न आल्यास त्यात पडून एखाद्याला गंभीर इजा होण्याचीही शक्यता असते. हे लक्षात घेऊन मलवाहिन्यांच्या मॅनहोल्सवरही आता जाळ्या बसवण्यात येणार आहेत.
ज्या भागांमध्ये पाणी साचतं अशा भागांमधील मनवाहिन्यांच्या मॅनहोल्सवर तब्बल १ हजार जाळ्या बसवण्यात येत आहे. या कामाच्या पहिल्या टप्प्यात ३६८ जाळ्या बसवण्यात येणार आहेत. त्यातील बिडाच्या एका जाळीसाठी ९,५०० रुपये मोजण्यात येणार आहेत.
एल्फिन्स्टन येथील मटकर मार्गावर तुंबलेल्या पाण्यातून मार्ग काढताना उघड्या मॅनहोल्समध्ये पडून डॉ. दीपक अमरापूरकर यांचा गेल्या वर्षी मृत्यू झाला होता. अशीच एक घटना मुलुंडमध्येही घडली होती. यापार्श्वभूमीवर यंदा महापालिकेने पावसाळ्यात विशेष खबरदारी घेतली आहे.
मुंबईतील मलवाहिन्यांच्या मॅनहोल्स झाकणं बंद असतात. पावसाचं पाणी तुंबल्या ही झाकणं उघडली जातात किंवा काही ठिकाणी या झाकणांची चोरीही होते. हे लक्षात घेऊन महापालिका लोखंडाच्या ऐवजी बिडाची झाकणं बसवणार आहे. एकूण १ हजार मॅनहोल्सवरच्या जाळ्यांपैकी ३६८ जाळ्या उपलब्ध असल्याने उर्वरीत ६३२ जाळ्यांची खरेदी करण्यात येत असल्याचं मल:निस्सारण प्रचालन विभागाने स्पष्ट केलं आहे.
शहर व उपनगरे मिळून मल:निस्सारण वाहिन्यांचं एकूण १९९३ कि.मी लांबीचं जाळं असून त्यावर एकूण ७२ हजार मॅनहोल्स आहेत. यापैकी पाणी साचत असलेल्या भागांपैकी शहर भागांमधील ७०० मॅनहोल्सवर तर दोन्ही उपनगरांमध्ये प्रत्येकी १५० मॅनहोल्सवर या जाळ्या बसवण्यात येणार आहेत. या जाळ्या प्रत्येकी ९४८० दराने खरेदी केल्या जाणार आहेत.
हेही वाचा-
मुंबईत अजूनही ५५० मॅनहोल्स जाळ्यांविनाच!