डॉ. दीपक अमरापूरकर यांचा एलफिन्स्टन रोड येथे मॅनहोल्समध्ये पडून दुर्देवी मृत्यू झाल्यानंतर यंदा पावसाळ्यापूर्वी सर्व मॅनहोल्समध्ये झाकणांसह जाळ्या बसवण्याची मोहीम महापालिकेकडून हाती घेण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मॅनहोल्समध्ये या जाळ्या बसवण्यात येत असल्या, तरी अजूनही मुंबईतल्या सुमारे ५५० मॅनहोल्समध्ये जाळ्या बसवण्यात आलेल्या नाहीत.
आयुक्त अजोय मेहता यांनी महापालिका मुख्यालयात घेतलेल्या मासिक आढावा बैठकीत रस्त्यांवरील मॅनहोल्सची झाकणं आणि त्यावर बसवण्यात येणाऱ्या जाळयांबाबतची माहिती संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली. मुंबईतील रेल्वे स्टेशन जवळील परिसर, मंडई, नाट्यगृहे आदी वर्दळीची ठिकाणं तसेच पाणी साचण्याची संभाव्य ठिकाणं आदींपैकी ज्या ठिकाणी मॅनहोलच्या झाकणांखाली जाळ्या लावण्याचे ठरले होते, त्या ठिकाणी जाळ्या बसविण्यात आल्याची खात्री करून घ्यावी, असे निर्देश आयुक्तांनी सर्व विभागांच्या सहायक आयुक्तांना दिले आहेत.
या निकषांच्या आधारे आणखी कुठे जाळ्या बसविणे आवश्यक वाटत असल्यास त्याबाबत संबंधित विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांनी पर्जन्यजलवाहिनी खात्यास कळवावे, असेही आदेश त्यांनी दिले आहेत. आतापर्यंत वर्दळीच्या ठिकाणी मॅनहोलमध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जाळी बसविण्याची कार्यवाही सुरु असून एकूण १ हजार ४५० मॅनहोलपैकी ९०० ठिकाणी जाळ्या बसविण्यात आल्या असल्याची माहिती पर्जन्य जलवाहिनी विभागामार्फत देण्यात आली आहे.
हेही वाचा
डाॅ. अमरापूरकरानंतर कुणाचा जीव घेणार? जलवाहिन्यांच्या व्हॉल्वचे चेंबर तुटकेच